लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : कुटुंबातील आर्थिक बारकावे हेरून परिस्थितीशी तडजोड करून संसाराचा गाडा हाकताना महिला खंबीर भूमिका बजावताना दिसतात. ‘चूल अन् मूल’ ही संकल्पना बाजूला करून ग्रामीण भागातील महिलांनी शेती व दूध व्यवसायात मोठी भरारी घेतली आहे. यामुळे महिलाच कुटुंबाचा खऱ्या अर्थाने आधार असल्याचे मत सरपंच ज्योत्स्ना पाटील यांनी व्यक्त केले.
कुडित्रेत महिला मेळावा व गृह उद्योग प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य रसिका पाटील होत्या.
यावेळी ज्योत्स्ना पाटील म्हणाल्या, ‘ग्रामीण भागातील महिलांचा शैक्षणिक स्तर वाढला असल्याने सभोवतालच्या परिस्थितीचे चांगले ज्ञानही वाढले आहे. याचा वापर गृहउद्योग व व्यवसायासाठी करून कुटुंबाचे आर्थिक दृष्टीने सबलीकरण करण्यासाठी करावे.’
यावेळी रसिका पाटील म्हणाल्या, ‘शेती, दुग्ध व्यवसायाबरोबरच महिलांना घरबसल्या गृह उद्योग व त्यासाठी लागणारे प्रशिक्षण व कर्ज शासन देते. महिलांनी अशा प्रशिक्षण व योजनांचा लाभ घ्यावा.’
यावेळी ग्रामपंचायत सदस्या उर्मिला पाटील, भारती पाटील, शीतल खेडकर, सुवर्णा भास्कर, सुवर्णा चौगले, आरती कुंभार अंगणवाडी सेविका, आशा सेविका व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
फोटो १२ कुडित्र फोटो
कुडित्रे तालुका करवीर येथे महिला मेळावा व व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना सरपंच ज्योत्स्ना पाटील, जि. प. सदस्य रसिका पाटील, ग्रामपंचायत सदस्य उर्मिला पाटील, शीतल खेडकर, सुवर्णा चौगुले, भारती पाटील, सुवर्णा भास्कर, आरती कुंभार.