घन:शाम कुंभार : यड्राव
येथील पंचवीस वर्षांहून अधिक काळ वापरात नसलेल्या पाण्याच्या टाकीचे आतील सिमेंटचा थर कोसळत आहे. टाकी शेजारून रहदारीचा रस्ता तसेच लहान मुलांच्या खेळण्यासाठी वावर असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडण्याआधी पाण्याच्या टाकीची विल्हेवाट लावावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
येथील रेणुकानगर परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीमधून २५ वर्षांपूर्वी गावात पाणीपुरवठा होत होता. तो पुरवठा लोकसंख्येच्या मानाने कमी होत असल्याने जीवन प्राधिकरणाच्या चौदा गावच्या योजनेतून शिरोळ तालुक्यातील एकमेव यड्राव गावास पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर वारणा नदीतून सन २०११ पासून स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनाद्वारे गावात पाणीपुरवठा होत आहे.
रेणुकानगरच्या पाण्याच्या टाकीमधून पाणीसाठा वाटप होत नसल्याने ती टाकी विनावापर आहे. पाण्याची टाकीच्या आतील छताचे स्लॅब कोसळत असल्याने टाकीतील पोकळीमुळे मोठा आवाज होत आहे. या टाकीपासून वसाहतीकडे जाणारे मार्ग आहेत तसेच शेजारील मैदानामध्ये मुले खेळतात.
दोन दिवसांपूर्वी दुपारच्या वेळेला टाकीच्या आतील छताचा भाग आतल्या आत कोसळल्याने मोठा आवाज आला. त्यावेळी भीतीने तिथून जाणाऱ्या ग्रामस्थांची पळापळ झाली. टाकी जवळून जाणाऱ्या ग्रामस्थांनी टाकीच्या आतील स्लॅब टाकीमध्येच पडल्याचे त्यांना सांगितले.
वारणा नदीतून स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना करताना रेणुकानगर येथील पाण्याची टाकी विनावापर व धोकादायक बनली असल्याची नोंद प्रस्तावात केली आहे) परंतु धोकादायक बनलेल्या टाकीची विल्हेवाट लावण्यास ग्रामपंचायतीने पाऊल उचलले नाही. अपघात होणार नाही याची दक्षता घेऊन व टाकीची विल्हेवाट लावण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे .
फोटो - १२०३२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ : यड्राव (ता. शिरोळ) येथील रेणुकानगरमधील विनावापर असलेल्या पाण्याची टाकी धोकादायक बनली आहे. (छाया : घन:शाम कुंभार)