आमजाई व्हरवडे : सिरसे (ता.राधानगरी) येथील घराची भिंत व छत कोसळून वसंत दौलू कांबळे (वय ४२) हा तरुण गंभीर जखमी झाला. सुदैवाने त्यांची पत्नी, दोन लहान मुले व आई बाहेर असल्याने वाचले.
अधिक माहिती अशी की, वसंत कांबळे हे दुपारी बारा वाजता आपल्या घरी झोपले होते, तर दोन मुले, आई व पत्नी दारातच बसले होते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने घराची भिंत भिजली होती. सर्व मंडळी घराबाहेर असताना अचानक मोठा आवाज झाला आणि सर्व घर वसंत यांच्या अंगावर कोसळले. वसंत ढिगाऱ्याखाली सापडले होते. सरपंच सुभाष पाटील (सिरसेकर) यांनी धाडसाने सर्जेराव भाटले, नितीन नकाते, महादेव कांबळे, आनंदा कांबळे, सचिन कांबळे, निवास पाटील, बाजीराव कोकणे पाटील या तरुणांना सोबत घेत दीड तासांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून बेशुद्ध असलेल्या वसंत यांना बाहेर काढून उपचारासाठी कोल्हापूरला दाखल करण्यात आले.
दरम्यान, घटनास्थळी राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर, गटविकास अधिकारी सभापती सोनाली पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, संपूर्ण घरच कोसळल्याने कांबळे कुटुंबीयांचे जवळपास दोन -तीन लाखाचे नुकसान झाले.