मुंबई : गतवर्षी अपुरा पाऊस पडल्यामुळे मुंबईतही पाणीप्रश्न पेटला आहे़ दरम्यान, तानसा पश्चिम जलवाहिनीवर तातडीच्या दुरुस्तीचे काम येत्या मंगळवारी हाती घेण्यात येत आहे़ त्यामुळे मुंबईकरांना ३६ तास २५ टक्के पाणीकपातीची झळ सहन करावी लागणार आहे़ गेल्या आॅगस्टपासून मुंबईत १५ टक्के पाणीकपात लागू केली आहे़ याचा फटका वितरण व्यवस्थेच्या टोकाला राहणाऱ्या रहिवाशांना बसत आहे़ त्यातच आता ठाणे येथे १८०० मि़मी़ व्यासाच्या तानसा पश्चिम जलवाहिनीवर तातडीने दुरुस्ती करावी लागणार आहे़ हे काम १० मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होत आहे़ बुधवारी ११ मे रोजी रात्री ११ वाजता हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे़ या ३६ तासांमध्ये संपूर्ण मुंबईत पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात असणार आहे़ तसेच पाणी वितरणाच्या टोकाला व उंचावरील विभागांमध्ये, शहर विभागात थेट पाणीपुरवठा होणाऱ्या इमारतींमध्ये पाण्याचा दाब कमी असणार आहे़ परिणामी, या रहिवाशांवर पाणीबाणीची परिस्थिती ओढावणार आहे़ (प्रतिनिधी)
मुंबईत ३६ तासांसाठी २५ टक्के पाणीकपात
By admin | Published: May 07, 2016 4:54 AM