नागपूर : सामान्य ग्राहक गॅस कनेक्शन घेतो, तेव्हाच त्याचा सिलिंडरमुळे होणाऱ्या दुर्घटनेचा ४० लाख रुपयांचा विमा उतरविला जातो. मात्र, याची माहिती फारच कमी लोकांना असते. सरकार व कंपन्याही याचा प्रचार करीत नाही. त्यामुळे या विम्याच्या लाभापासून सामान्य नागरिक वंचित राहतात. नियमानुसार सिलिंडरच्या स्फोटामुळे झालेले नुकसान व वैद्यकीय उपचाराच्या खर्चापोटी ५० लाख रुपयांपर्यंतचा दावा केला जाऊ शकतो. त्यासाठी ग्राहकाने केवळ वितरकाकडे लेखी तक्रार देणे आवश्यक असते. दुर्घटनांचे सर्वेक्षण विमा अधिकाऱ्यांकडून करण्यात येते आणि काही प्रक्रियेनंतर ग्राहकाला विमा मिळू शकतो.तसेच या विम्याची माहिती एजन्सी ग्राहकांना देत नसेल, तर ग्राहक कोर्टात एजन्सीविरोधात याचिका दाखल करता येते, अशी माहिती कायदेतज्ज्ञांनी दिली. तर, अपघातानंतरही ग्राहकांकडून दावेच करण्यात येत नसल्याचे नागपुरातील बड्या सिलेंडर वितरक कंपन्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)