ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.६ - सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील शासकीय वसतीगृहातील १७ विद्यार्थ्यांना पोह्यातून विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या सर्व विद्यार्थ्यांवर सोलापूरमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
सोलापूरमधील शासकीय वसतीगृहातील एकूण ७७ विद्यार्थ्यांना पोहे देण्यात आले होते. यातील ४० विद्यार्थ्यांना काही वेळाने मळमळणे, उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ लागला. या सर्वांना तातडीने अक्कलकोटमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १७ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अक्कलकोटहून सोलापूरमधील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. आता या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची चौकशी सुरु असून पोह्यातून विषबाधा कशी झाली हे अद्याप अस्पष्ट आहे.