Amruta Fadnavis on CM Devendra Fadnavis oath taking ceremony : महाराष्ट्रातील राजकीय कोंडी फुटली आणि आज राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा जंगी शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. याशिवाय शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी या तिघांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुंबईतील आझाद मैदानावर हा भव्य-दिव्य सोहळा पार पडला. फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
"मला अत्यंत आनंद होत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तसेच ते सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन हे लोककल्याणासाठी आणि समाजसेवेसाठी व्यतीत केले आहे. यापुढेही ते अशाच पद्धतीने धडाडीने काम करत राहतील. मी पुन्हा येईन ही एक लोकसेवेची घोषणा होती. ते दरवेळेला कामासाठी पुन्हा येत राहिले. काही वेळा पद असताना तर काही वेळा पद नसतानाही त्यांनी जनतेची सेवा केली. त्यामुळे मी पुन्हा येईन ही घोषणा दररोज झाली पाहिजे, कारण त्यामुळे आपला महाराष्ट्र सर्व क्षेत्रात नंबर वन होईल," अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, या समारंभाला सुरुवात होण्याआधीही अमृता फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. "जिद्द, चिकाटी आणि संयम यामुळे देवेंद्र फडणवीस आज इथे आहेत. आजचा दिवस खूप सुंदर आहे. लाडकी बहीण हा एक सुंदर प्रोजेक्ट आहे. देवेंद्रजी आणि महायुतीशी सर्व बहिणी प्रेमाने जोडल्या गेल्या. एखादी गोष्ट मिळावायची असेल तर आपल्याला समोर अर्जुनासारखं फक्त आपलं टार्गेट दिसायला हवं. गादीसाठी पुन्हा यायचं नाही. तर पुन्हा यासाठी यायचं होतं कारण त्यांना तसा विश्वास होता. लोकांना विश्वास होता की, ते महाराष्ट्रासाठी जे काही करू शकतील ते अजून कोणी करू शकत नाही. त्या विश्वासामुळेच ते पुन्हा आलेत याचा आनंद आहे," असे त्या म्हणाल्या होत्या.