Anjali Damania: पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशियत वाल्मीक कराड याच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप करत वाल्मीकच्या आईने परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर आज सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत वाल्मीक कराडवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उल्लेख करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे की, "वाल्मीक कराड यांच्या आईंना सर्वप्रथम नमस्कार. आई आपण भोळ्या आहात, आपला मुलगा आणि नातू काय करतात याची कल्पना तुम्हाला असती तर आपण 'माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे' असं कधीच म्हणाला नसतात. आपल्या मुलावर असलेल्या आरोपांची यादी मी पाठवत आहे. आपण ही यादी पाहावी, ही विनंती. त्यांच्यावर याला गुन्ह्यात झालेला FIR देखील आपण पाहावा," असं आवाहन दमानिया यांनी केलं आहे.
अंजली दमानिया यांनी वाल्मीक कराडच्या आईंना उपस्थितीत केलेले प्रश्न
१. आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? २. आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? ३. आपला मुलगा काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? ४. संतोष मुंडे याच्या क्रूर हत्येनंतर त्यांचा पत्नीने वाल्मिक कराड यांचे नाव घेतले, ते चुकीचे आहे का? ५. आवादा कंपनीचे लोक यांनी केलेला FIR खोटा आहे का? ६. गोट्या गित्तेसारखी माणसं सदगृहस्त आहेत का?
दरम्यान, "एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल प्रेम असणे योग्य आहे, पण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही. त्यामागचे वास्तव आपण बघा ही विनंती. ‘वास्तव’ ह्या पिक्चर आपण बघा. एक वाया गेलेल्या मुलाला, आईने काय करायला हवं, ते आपण पाहा. संतोष देशमुख हे देखील कोणाचे पाती, वडील व भाऊ होते. त्यांना न्याय मिळायला हवा की नाही?" असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला आहे.