मुंबई : त्रयस्थ समितीमार्फत शाळांची सुरू असलेली फेरतपासणी पूर्णत: रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी शिक्षण उपसचिवांनी घेतल्याने महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने दहावीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. शिक्षक बुधवारपासून दहावी पेपर तपासणीचे काम सुरू करणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.शिक्षण विभागाने विनाअनुदानित शाळांची यापूर्वी अनेक समित्यांमार्फत तपासणी करून शाळांना अनुदानास पात्र ठरवले आहे. बहुतांश शाळा अपात्र ठरल्यानंतर पुन्हा त्रयस्थ समितीकडून शाळांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अनुदानास पात्र ठरलेल्या अनेक शाळा चुकीची कारणे दाखवून अपात्र ठरविण्यात आल्याप्रकरणी कृती समितीने त्रयस्थ समिती रद्द करून पात्र झालेल्या शाळांना अनुदान देण्याच्या प्रमुख मागणीसाठी समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती. तावडे यांनी त्रयस्थ समिती रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शिक्षण विभागाकडून हे आश्वासन पाळले जात नसल्याने शिक्षकांनी दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. शिक्षणमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा केल्यानंतर ही शाळांची फेरतपासणी सुरूच राहिल्याने समितीने आपले आंदोलन अधिकच तीव्र केले होते. अखेर शिक्षण उपसचिव राजेंद्र पवार यांनी शाळांची फेरतपासणी करण्याचा निर्णय रद्द केल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शिक्षकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यानुसार बुधवारपासून पेपर तपासण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)शाळा कृती समितीने दहावीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. शिक्षक बुधवारपासून दहावी पेपर तपासणीचे काम सुरू करणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.
पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे
By admin | Published: March 18, 2015 2:02 AM