पुणे : पुण्यातील प्रतिष्ठित ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’(एफटीआयआय)च्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादावर येत्या मंगळवारी (२९ सप्टेंबर) तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली असून, सरकारचे चर्चेचे निमंत्रण मान्य करीत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गत १८ दिवसांपासून आरंभलेले आमरण उपोषण मागे घेतले आहे.चौहान यांना हटविण्याच्या मागणीसाठी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी गत तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून चालवलेले आंदोलन तीव्र करीत गत १८ दिवसांपासून आमरण उपोषण आरंभले होते. मात्र रविवारी अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने चर्चेचे आमंत्रण दिले आणि या आमंत्रणाचा स्वीकार करीत विद्यार्थ्यांनाही आपले उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. एफटीआयआय विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी रंजित नायर यांनी याबाबतची घोषणा केली. सरकारसोबतची चर्चा सकारात्मक वातावरणात व्हावी, यासाठी आम्ही उपोषण मागे घेतले आहे. मंगळवारी मुंबईच्या फिल्म्स डिव्हिजनमध्ये सरकारने आम्हाला चर्चेसाठी बोलावले आहे, असे नायर म्हणाले.केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने चर्चेसाठी बैठक व तारीख निश्चित केल्यास उपोषण मागे घेण्याची तयारी शनिवारी विद्यार्थ्यांनी दर्शविली होती. यानंतर सरकारनेही तातडीने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चेची तयारी दर्शवीत तसा प्रस्ताव दिला. चौहान यांच्या नियुक्तीविरोधात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी प्रखर आंदोलन उभारले होते. अभिनेते अनुपम खेर, रणबीर कपूर, सलमान खान यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या आंदोलनात उडी घेतली होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला होता. (प्रतिनिधी)
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2015 2:06 AM