Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष वाढत आहे. दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्न अधिक तापताना दिसत आहे. यावरून ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे नेते शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. तर, भाजप आणि शिंदे गटातील नेतेही प्रत्युत्तर देत आहेत. यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना गुजरातमध्ये जेवढा फायदा झाला, तेवढाच महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना होईल, असा टोला शिंदे गटाकडून लगावण्यात आला आहे.
शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटाकडून होत असलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलो असतो तर माझ्या नावसमोर माजी आमदार असे लागले असते. उद्धव ठाकरेंची तब्बेत बरी नाही म्हणून रश्मी वहिनींना मुख्यमंत्री खुर्चीवर बसवा असे सांगणारा मी होतो, असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या जालना दौऱ्यावरून टीकास्त्र
अब्दुल सत्तारांनी उद्धव ठाकरे यांच्या जालना दौऱ्यावर टीका केली. चांगली गोष्ट आहे प्रत्येकाने बाहेर फिरायला पाहिजे पक्षवाढीसाठी चांगले आहे. आता सर्वच बाहेर फिरत आहेत, राहुल गांधी तिकडे फिरत आहेत, त्यांना हिमाचल प्रदेश मध्ये फायदा झाला, असा टोला सत्तारांनी लगावला. तसेच राहुल गांधीना गुजरात मध्ये जेवढा फायदा झाला तेवढा फायदा उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात होणार असल्याचा दावाही सत्तारांनी केला.
दरम्यान, सीमावादाबाबत महाराष्ट्र कधीही तडजोड करणार नाही. दोन्ही बाजूला भाजप सरकार आहे. त्यामुळे अमित शाह तोडगा करतील. भविष्यात असे वाद होणार नाही, यासाठी केंद्र सरकारने लक्ष घालावे. राज्यातील सर्व पक्ष एकत्र आहेत. विरोधकांनी एकजूट होऊन महाराष्ट्रासाठी लढावे. केंद्र सरकार आपल्याला न्याय देईल. महाराष्ट्रच्या हिताचे जे बोलतील त्या सोबत आम्ही आहोत, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"