लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शाळांच्या उपाहारगृहांमध्ये यापुढे चिप्स, मिठाई, नूडल्स, केक, बिस्किटेसह जंक फूड विक्रीला ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने आज याबाबतचा आदेश काढला. बंदी घालण्यात आलेल्या पदार्थांची शाळांमध्ये विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनावर असेल. केंद्राच्या महिला व बालकल्याण विभागाने शालेय विद्यार्थ्यांना मीठ, साखर व मेदयुक्त पदार्थ वर्जित करण्याबाबत व आरोग्यास लाभदायक असलेल्या पदार्थांचा वापर करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक कार्यगट स्थापन केला होता. या कार्यगटाने केलेल्या शिफारशींच्या आधारे आता शाळांमधील उपाहारगृहांमध्ये विक्रीसाठी बंदी घातलेल्या आणि परवानगी असलेल्या पदार्थांची यादीच महिला व बालकल्याण विभागाने या आदेशात जारी केली आहे. या पदार्थांना परवानगी : शाळांच्या उपाहारगृहांमध्ये पुढील पदार्थ ठेवण्याची परवानगी असेल - ज्यामध्ये ऋतुनिहाय भाज्या असतील, अशी गव्हाची पोळी/पराठा एकापेक्षा जास्त धान्याच्या पिठापासून तयार केलेली पोळी/पराठा, भात, भाजी, पुलाव आणि डाळ, भाजी पुलाव, भात आणि काळा चणा, गव्हाचा हलवा सोबत चणा, गोड दलियासोबत नमकीन दलिया भाजी, भात आणि पांढरा चणा, भात आणि राजमा, कढीभात, बलगर गहू उपमा किंवा खिचडी/हिरवे आणि डाळ कट्टू, पायसाम, पपई/टोमॅटो/अंडी, चिंचेचा भात, हिरवे कट्टू, बलाहार पायसम, पपई/टोमॅटो, बंगाली चणे, भात, सांबर, इडली, वडा-सांबर, खीर, फिरनी, दूध/दुग्धजन्य पदार्थ, भाज्यांचा उपमा, भाज्यांचे सँडविच, भाज्यांची खिचडी, नारळाचे पाणी, शिकंजी, जलजीरा. या पदार्थांवर बंदी : शाळांच्या उपाहारगृहांमध्ये पुढील पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे - चिप्स, तळलेले पदार्थ, स्थानिक उत्पादकांनी तयार केलेले चिप्स, सरबत, बर्फाचा गोळा, शर्करायुक्त कार्बोनेटेड शीतपेय आणि नॉन कॉर्बोरेटेड शीतपेय, रसगुल्ले, गुलाबजामुन, पेढा, कलाकंदसह सर्व प्रकारची मिठाई, नूडल्स, पिझ्झा, बर्गर, टिक्का, पाणी-पुरी, सगळ्या प्रकारच्या चघळण्याच्या गोळ्या आणि कँडी, ३० टक्क्यांपेक्षा अधिक जास्त साखर असलेले पदार्थ जसे - जिलेबी, इमरती, बुंदी आदी, सगळ्या प्रकारचे चॉकलेटस्, केक आणि बिस्किटे, बन्स आणि पेस्ट्री, जाम आणि जेली.
शाळांमध्ये जंकफूड विक्रीवर आली बंदी
By admin | Published: May 09, 2017 2:30 AM