ऑनलाइन लोकमत
शेखपुरा (बिहार), दि. ७ - भाजपाचे नेते बिहारमध्ये विकासाची भाषा बोलतात परंतु तिकडे महाराष्ट्रामध्ये भाजपा व शिवसेनेचे नेते इथून रोजगारासाठी तिकडे केलेल्या तरुणांना मारहाण करतात आणि नरेंद्र मोदी मौन बाळगतात, असा आरोप करत राहूल गांधींनी भाजपा व नरेंद्र मोदींवर प्रचारसभेत तुफानी हल्ला चढवला. अत्यंत आक्रमक शैलीमध्ये मोदींनी निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख करत मोदींनी एकही आश्वासन पाळलेले नसून त्यांचे सरकार केवळ श्रीमंत व उद्योपतींसाठी काम करत असल्याचा आरोप केला.
ज्या ज्यावेळी निवडणुका जवळ येतात त्या त्या वेळी भाजपा हिंदू - मुस्ली, मराठी - बिहारी असे वाद पेटवतो असा आरोपही राहूल गांधींनी केला.
राहूल गांधींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
- बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार येईल असा मला विश्वास आहे. नंतर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरयाणा अशा सगळ्या राज्या राज्यांमधून आम्ही भाजपाला हद्दपार करणार.
- भाजपा हिंदू - मुस्लीम, मराठी - बिहारी असं आपसात लढवतं. आमचा बंधुभावावर विश्वास आहे.
- आम्ही तुम्हाला पाणी, रस्ते आणि रोजगार देऊ. आम्ही भलतीसलती अस्वासनं देणार नाही, आणि जे बोलू ते वास्तवात करू.
महाराष्ट्रातले भाजपा शिवसेनेचे नेते बिहार उत्तर प्रदेशातून रोजगारासाठी गेलेल्यांना मारतात आणि पळवून लावतात. मोदींनी कदी याचा विरोध केलाय का?
नरेंद्र मोदी हे फक्त श्रीमंतांसाठी, उद्योगपतींसाठी काम करतात आणि गरीबांकडे, मजुरांकडे, महिलांना किंमत देत नाही. हाच आमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे.
- मोदी अमेरिकेत गेले, आणि श्रीमंती कपड्यांचं प्रदर्शन त्यांनी मांडलं. वेगवेगळ्या रंगांचे कपडे ते सारखे बदलत होते. नितिशकुमारांना तुम्ही कधी बघितलंय झगमगत्या कपड्यात. याला साधीराहणी म्हणतात.
- मोदींच्या सभेमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम अशा उद्योगपतींना बघाल परंतु कधी शेतकरी, मजूर, कष्टकरी त्यांच्या सभेत दिसत नाही. मोदी हे भांडवलदारांसाठी काम करतात, गरीबांसाठी नाही.
- विदेशातला काळा पैसा आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकू असं सांगितलं. एकाच्या तरी खात्यात पैसे जमा झाले का असे विचारत राहूल गांधींनी बिहारमधल्या सभेत मोदींवर तुफान हल्ला चढवला.
- मोदींनी महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते, पण सध्या कांदा, टॉमेटो, डाळीचे दर काय आहेत.