राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी राज्यात दौरा सुरू केला आहे. आज विदर्भातील दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केले. तसेच, शिवसेना हे पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचे काम निवडणूक आयोगाचे नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. यावरून भाजपाने आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
"हिंमत तर एकदा शपथेवर सांगाच. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसजींचे फोन तुम्ही का घेतले नाहीत?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) य़ांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. "घ्या, जगदंबेची शपथ !! वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे "सुत " आहात, तर आता सांगाच तुमचे "सुत" कोणाशी जुळले होते?" असा सवालही विचारला आहे. चंद्रशेखर बावनकुळे आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"जागोजागी देवाधिकांच्या "शपथा" का घेताहात?"
"उद्धवजी, केंद्र सरकारच्या लोकाहिताच्या योजनांना फसव्या, बोगस म्हणून तुम्ही बांधावर, टपरीवर चर्चा करणार असाल तर, होऊ द्या चर्चा!! पण, सद्या एकच चर्चा आहे. ती म्हणजे, तुम्ही जागोजागी देवाधिकांच्या "शपथा" का घेताहात? मग, असेल हिंमत तर एकदा शपथेवर सांगाच. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसजींचे फोन तुम्ही का घेतले नाहीत? घ्या, जगदंबेची शपथ !! वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे "सुत " आहात, तर आता सांगाच तुमचे "सुत" कोणाशी जुळले होते? घ्या शपथ आणि कळू द्या तुमची वचनबद्धता.!! उद्धव ठाकरेजी, चर्चा तर होणारच!" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव, शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं"
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला याआधी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव, शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. "गद्दारी करून मिळवलेली सत्ता तुम्हाला टिकवता आली नाही. आणि आता खोट्या शपथा घेऊन थापा मारत आहात" अशा शब्दांत निशाणा साधला. यासोबतच "शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असे तुम्ही सांगायचे. पण हे पद तुम्ही स्वतःच बळकावले" असंही म्हटलं आहे.