Maharashtra Politics: “काश्मीरमधील विकासाची पहाट बघवेना? राहुल गांधींचं पोट का दुखावं?”; भाजपचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 03:15 PM2023-02-13T15:15:38+5:302023-02-13T15:16:55+5:30
Maharashtra News: एवढे वर्ष काश्मीरला राजकारणासाठी अंधारात कोंडून ठेवले. आता तरी विकासाची भूमिका घ्या, या शब्दांत पलटवार करण्यात आला आहे.
Maharashtra Politics: अलीकडेच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची सांगता झाली. यानंतर राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना अदानी समूहावरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेवरून भाजपवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेच भाजपकडून खरपूस शब्दांत समाचार घेण्यात आला असून, प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरला रोजगार, उत्तम व्यवसाय आणि प्रेम हवे होते, पण त्यांना काय मिळाले? भाजपचा बुलडोझर. तेथील लोकांची अनेक दशके कष्टाने सिंचन केलेली जमीन हिसकावली जात आहे. त्यांना. शांती आणि काश्मीच्या लोकांची रक्षा एकत्र येण्याने होईल, तोडल्याने नाही, असे ट्विट करत राहुल गांधींनी टीका केली. यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पलटवार केला आहे.
काश्मीरमधील विकासाची पहाट बघवेना?
केशव उपाध्ये यांनी एक ट्विट केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे पण राहुल गांधींचे पोट दुखावे? एवढे वर्ष काश्मीरला राजकारणासाठी अंधारात कोंडून ठेवले, आणि आता विकासाची पहाट पण बघवेना? आता तरी विकासाची भूमिका घ्या, या शब्दांत केशव उपाध्ये यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, काँग्रेस,पीडीपीसह अनेक मोठ्या पक्षांनी या अतिक्रमण विरोधी मोहीमेवरून चिंता व्यक्त केली आहे. याचबरोबर हे तत्काळ थांबण्याची मागणी केली आहे. महसूल विभागाचे आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी सर्व उपायुक्तांना सरकारी जमिनींवरील अतिक्रमण १०० टक्के हटवण्याचे निर्देश होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील मोठ्याप्रमाणावरील जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"