BJP Narayan Rane News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केले. औरंगजेब क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस तेवढेच क्रूर आहेत, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानावरून महायुतीतील नेते काँग्रेसवर सडकून टीका करत आहेत. भाजपा खासदार नारायण राणे यांनीही यावरून टीकास्त्र सोडले.
मीडियाशी बोलताना नारायण राणे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. हर्षवर्धन सपकाळ मूर्ख माणूस आहे. औरंगजेब कोण होता? महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काय लोक म्हणतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. औरंगजेबाची उपमा आताच्या सरकारमध्ये आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर बोलणे योग्य नाही. हर्षवर्धन सपकाळ यांना राज्यातील प्रश्न माहिती नाहीत. कोणत्या विषयासाठी अध्यक्षपदाचा उपयोग करायचा आहे, त्या माणसाला माहिती नाही. हा पक्ष वाढवण्यासाठी नेमणूक झाली नाही, तर पक्ष बुडवण्यासाठी या माणसाची नेमणूक झालेली आहे, या शब्दांत नारायण राणे यांनी सुनावले.
समुद्रत तेल साठे सापडले असतील तर चांगली गोष्ट
समुद्रत तेल साठे सापडले असतील तर चांगली गोष्ट आहे. त्याचा सर्व्हे होऊ देत, किती खाली तेलसाठा आहे समजू दे. मालवणसाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, हर्षवर्धन सपकाळ यांची आताच नवीन नियुक्ती झाले आहेत. सरकारवर टीका करतो, हे दिल्लीला दाखवायला पाहिजे त्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. काँग्रेसने आत्मचिंतन केले पाहिजे. काँग्रेसने आपला पराभव असा का झाला? हे पाहिले पाहिजे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये आमदार सोडा, स्वतःच्या ग्रामपंचायतीचे सदस्य किती आहेत हे पहिले भिंग घेऊन शोधले पाहिजे. मग त्यांनी आम्हाला सल्ला दिला पाहिजे, असा पलटवार उदय सामंत यांनी केला.
दरम्यान, आम्ही जो काही कारभार केला, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केला आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, असा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. तोच आदर्श छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा होता, कोणाची तुलना करत आहात तुम्ही जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे, असा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.