भाजपचे ‘ऑपरेशन उद्धव’, ‘मातोश्री’चा दरारा कमी करण्याचा डाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 07:54 AM2022-07-01T07:54:36+5:302022-07-01T07:54:46+5:30

...‘ऑपरेशन उद्धव ठाकरे’ पार पाडले गेले. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदही नाकारले असले तरी ‘मातोश्री’चा रिमोट कंट्रोल आता उरला नाही, असे आजचे चित्र आहे. 

BJP's Operation Uddhav a ploy to reduce the terror of Matoshri | भाजपचे ‘ऑपरेशन उद्धव’, ‘मातोश्री’चा दरारा कमी करण्याचा डाव?

भाजपचे ‘ऑपरेशन उद्धव’, ‘मातोश्री’चा दरारा कमी करण्याचा डाव?

googlenewsNext

अतुल कुलकर्णी -

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वगळून भाजपला महाराष्ट्रात स्वतःचे सरकार बनवायचे आहे. त्यासाठी गेले काही महिने पडद्याआड सुरू असलेल्या हालचालींना अखेर मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा भाऊ आणि लहान भाऊ कोण, यावरून होत असणारे वाद भाजपला कायमचे संपवायचे आहेत. त्यांना महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणण्यासाठी जे जे म्हणून अडसर आहेत ते दूर करण्यासाठी भाजपने सर्व मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे. त्यातूनच ‘ऑपरेशन उद्धव ठाकरे’ पार पाडले गेले. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदही नाकारले असले तरी ‘मातोश्री’चा रिमोट कंट्रोल आता उरला नाही, असे आजचे चित्र आहे. 

राजकारणात जर तर यास अर्थ नसतो. पण आजूबाजूला घडणाऱ्या राजकीय घडामोडी, वेगवेगळ्या पक्षांतील नेत्यांचे नातेसंबंध, एकमेकांशी त्यांचे असलेले वागणे जो बारकाईने बघत असतो, त्याच्या खेळी नेहमी यशस्वी होतात. देवेंद्र फडणवीस यांनी नेमके तेच केले. ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना वागणूक देत होते, ती नेमकी हेरून त्यांनी फासे टाकले आणि त्यात ते यशस्वी झाले. 

मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अडीच वर्षांत झालेले दुर्लक्ष फडणवीसांना फायद्याचे ठरले. सातत्याने शिवसेनेचे आमदार ठाकरे यांना अजित पवारांच्या वागणुकीविषयी सांगत होते. मात्र स्वपक्षाच्या आमदारांना वेळ न देता ठाकरे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वेळ देताना दिसायचे. शिवसेना आमदारांमध्ये त्यातून अस्वस्थता वाढतच गेली.

राष्ट्रवादी सर्वात मोठा लाभार्थी -
या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये तीन पक्षांच्या तीन कथा आहेत. सरकारमध्ये असण्याचा सगळ्यात जास्त फायदा राष्ट्रवादीचा झाला. जो पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर होता, ज्या पक्षाच्या प्रमुख नेत्याने भाजपसोबत पहाटे जाऊन शपथविधी केला होता. मात्र शरद पवार यांच्या धाकापोटी पहाटे गेलेले आमदार परत आले. त्या पक्षाला अडीच वर्षांत महाराष्ट्रात हातपाय पसरायला पुरेसा वाव मिळाला. पक्षाची पडझड थांबवता आली. स्वतःच्या घराची डागडुजी करायला वेळ मिळाला. हाती सत्ता आल्यामुळे मतदारसंघ मजबूत करता आले. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी सगळ्यात मोठा लाभार्थी ठरला. राष्ट्रवादीतील महत्त्वाच्या नेत्यांचे वय साठीच्या पुढे आहे. मात्र पक्षाने जाणीवपूर्वक तरुण पिढीदेखील जोडण्याचे काम सुरू ठेवले आहे.

शिवसेनेचे सर्वाधिक नुकसान -
भाजपच्या राजकारणाचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रावर होऊ शकतात. त्यातून आपला पक्ष संपू शकतो, हे लक्षात आल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेतला. त्याच पक्षाचे सगळ्यात मोठे नुकसान झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी स्थानिक आमदार आणि शाखाप्रमुख यांच्या भरवशावर राजकारण केले. त्यांचा कार्यकर्त्यांशी थेट संबंध उरला नाही. त्यामुळे आता जे आमदार त्यांना सोडून गेले, त्यांच्यासोबत त्या त्या जिल्ह्यात पक्षाला मोठे खिंडार पडले आहे.

काँग्रेसचे काय होणार? -
महाविकास आघाडीचे सरकार येण्याआधीही काँग्रेस असून नसल्यासारखी होती. आजही ती तशीच आहे. अडीच वर्षांत त्यात काहीही फरक झालेला नाही. सत्ता असूनही काँग्रेसला विधान परिषदेत स्वतःची हक्काची मतेसुद्धा टिकवता आली नाहीत. जर संधी चालून आलीच तर काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये जातील. काही आपापल्या मतदारसंघाच्या सोयीनुसार राष्ट्रवादीमध्ये जायला कमी करणार नाहीत. सगळ्यांना बांधून ठेवेल आणि सगळे ज्याचे ऐकतील, असे नेतृत्व महाराष्ट्रात काँग्रेसकडे उरले नाही. प्रमुख नेत्यांचे सरासरी वय ७० च्या घरात आहे. प्रत्येक जण नेता झाला आणि राज्यातल्या कार्यकर्त्यांवर कोणाचीही पकड उरली नाही. मी पक्षात जिवंतपणा आणतो, पक्ष उभारण्याचे काम करतो, असे जर एखादा नेता म्हणाला तर त्याने केलेल्या कष्टानंतर त्याचे फळ त्याला दिल्लीश्वर देतीलच, याची कसलीही खात्री त्याला नसते. यामुळेच तरुण पिढी काँग्रेसपासून कधीच दूर गेली. ती जवळ यावी यासाठी कोणीही जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच काँग्रेसची महाराष्ट्रात ही अवस्था झाली आहे.

शांतपणे केले नियोजन -
भाजपने मात्र शांतपणे नियोजन करत एकाच नेत्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अन्य पक्ष पद्धतशीरपणे संपविण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे हे सगळ्यात मोठे टार्गेट होते. त्यांच्या शिवसेनेत उभी फूट पाडण्यात भाजपला यश आले. उद्धव ठाकरे यांची राजकीय उंची एका झटक्यात कमी केली गेली. याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर पडणार आहेत. आजवर ठाकरे घराण्याचा वरचष्मा मुंबईवर राहिला. त्यालाच या घटनेने तडा गेला आहे. मराठी माणूस, मराठी अस्मिता यावर मुंबईमध्ये ठाकरेंचे राजकारण टिकून होते. कुठलाही नेता आला की, तो मातोश्रीवर हमखास जायचा. तो दरारा, ती भीती कालच्या एका घटनेने पूर्णपणे धोक्यात आली आहे. मात्र रात्री अचानक देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला लावण्यात आली. त्यावरून भाजपच्या मनात नेमके काय चालू आहे, याचा थांगपत्ता लागत नाही यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

राजकारणाबाबत प्रश्नचिन्ह -
राज ठाकरे यांना कुठल्या ना कुठल्या कारणांची भीती घालून स्वतःकडे वळविण्यात भाजप यशस्वी झाला आहे. शिवाय मनसेकडे खालपर्यंत कार्यकर्त्यांचे पाठबळ उरलेले नाही. अशा परिस्थितीत आज जे बंडखोर आमदार भाजपसोबत सत्तेत सहभागी होत आहेत, त्यापैकी अनेकांचे पंख येत्या काळात छाटले जातील किंवा त्यांना मर्यादित केले जाईल. त्या त्या ठिकाणी भाजप आपले हातपाय पसरेल.

Web Title: BJP's Operation Uddhav a ploy to reduce the terror of Matoshri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.