- मयूर देवकर
औरंगाबाद, दि.28 - शिक्षणासाठी अत्यंत गरजेची असणारी पुस्तके विकत घेऊ न शकणारी अनेक कुटुंब आपल्या शहरात आहेत. केवळ पुस्तकखर्च झेपत नसल्यामुळे शाळा सोडणा-यांचे प्रमाणही खूप जास्त आहे. आपल्यापरीने काही विद्यार्थ्यांना आपण या प्रकारची मदत करू शकलो तर त्यांच्या शिक्षणाची वाट थोडीशी सुकर होईल या हेतूने इरशाद खान यांनी ‘बुक्स बँक’ सुरू केली. दात्यांकडून जूने शालेय पुस्तके, वर्कबुक, को-या वह्या, साहित्य, गणवेश जमा करून ते गरीब-गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे कार्य या उपक्रमाद्वारे केले जाते.
ते म्हणतात, ‘शालेय पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांची मूलभूत गरज आहे. परंतु कित्येक कुटुंब ही एवढी गरीब असतात की, त्यांना इच्छा असूनही पुस्तके विकत घेणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण जूनी पुस्तके एकत्र करून ते या गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवू शकलो तर नक्कीच त्यांना फायदा होईल.’ आधी सोशल मीडियावर या उपक्रमाची माहिती देण्यास सुरूवात केल्यावर अनेकांनी त्यांच्या संपर्क साधून पुस्तके देण्याबाबत विचारणा केली. अगदी मुंबई, पुणे, सातारा, सांगलीहून लोकांनी इच्छा व्यक्त केली.
शहरातील नागरिकांनीसुद्धा आवर्जुुन पुस्तके दान केली. त्यानुसार सध्या ‘बुक्स बँके’त सहावी, नववी, दहावी आणि बारावीचे संच जमा झाले आहेत. तसेच सीईटी, एमबीए, गाईड्स, इंग्लिश स्पोकन, डिक्शनरी, इंग्रजी व्याकरण, गणवेशही उपलब्ध आहेत. इरशादा यांना मात्र अधिकाधिक पहिली ते पाचवी इयत्तेच्या पुस्तके जमा करायची आहेत. कारण याच वयातील मुलांना शाळा व पुस्तकांची गोडी लागली तर मोठेपणीदेखील ती कायम राहिले. शालेय अभ्यासक्रमाशी निगडित कोणतेही गोष्ट ते स्वीकारतात.
जून महिन्यात वाटप
उन्हाळ्याच्या सुट्यामध्ये जास्तीत जास्त पुस्तके जमा करून औरंगाबादच्या आसपास औद्योगिक वसाहतीमध्ये राहणा-या गरीब विद्यार्थ्यांना जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर वाटप करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी ते विविध शाळांमध्ये जाऊन शिक्षक, विद्यार्थी व पालकांना जूनी पुस्तके व साहित्य दान करण्यास प्रवृत्त करीत आहेत.