वसंत भोईर,
वाडा- तालुक्यातील कडुस येथे असलेल्या कोका कोला कंपनीमध्ये सुमारे पाचशे बोअरवेल मारण्यात आल्या आहेत. त्यांच्या पाणी उपशामूळे कु डूस परिसरातील पाण्याची पातळी प्रचंड वेगाने कधी नव्हे ती यावर्षी खाली जात आहे. शिवाय कंपनीचया सांडपाण्यामुळे या परिसरातील बोअरवेलला क्षारयुक्त पाणी येत असल्यामुळे मोठया प्रमाणात पाण्याचे आजार पसरले असून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे पालघर जिल्हाउपाध्यक्ष गोविंद पाटील यांनी केली आहे. कुडूस ग्रामपंचायतीचया हद्दीत कोकाकोला ही शीत पेये व बाटली बंद पाण्याचे उत्पादन करणारी कंपनी आहे.या कंपनीला दररोज दाखो लिटर्स पाणी लागते हे पाणी कंपनीत असलेल्या बोअरवेल व नदीवरील बंधाऱ्यातून कंपनी उचलते. ही कंपनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नाममात्र पाणीपट्टी भरते. त्यांच्या पाणी परवान्याची मुदत मार्च मध्येच संपली आहे. पंचायत समितीने पाणी बंद करण्याचा ठराव देखील घेतला आहे. तरी सुध्दा कंपनी राजरोसपणे लाखो लिटर पाणी उपसा करते. तालुक्यातील नद्यानाले, तलाव कोरडे पडले आहेत. नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. मात्र कंपनीच्या तहानेसाठी शासन उदार झाले आहे. कोकाकोला कंपनी परिसरातील पाण्याची पातळी खोल गेल्याने हातपंपांतून दूषित पाणी येत आहे.