ठाणे : महागिरी कोळीवाड्यातील कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड ) उठविण्यासाठी महागिरीवासीयांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. येथील ‘उमेद फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष नीलेश कोळी यांनी येथील नागरिकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष माधवी नाईक, नौपाडा मंडळ मच्छीमार सेल अध्यक्ष यशवंत कोळी आदींसह महागिरीवासीय उपस्थित होते. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून ठाण्याच्या खाडीकिनारी भागातील रासायनिक कंपन्यांमधील रासायनमिश्रित सांडपाणी तसेच शहराचे सांडपाणी खाडीत सोडले जात असल्याने कोळी बांधवांच्या पारंपरिक मासेमारी व्यवसायावर परिणाम होऊन संपूर्ण व्यवसाय बंद झाला. त्यामुळे येथील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कोळीवाड्याला लगेच सीआरझेड लागू करण्यात आला. त्यामुळे विकासकामे थांबली आणि वाढत्या कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली. शिवाय जुन्या इमारती धोकादायक झाल्याने इमारत पडल्यावर पुनर्बांधणीचे संकटदेखील प्रत्येकाच्या समोर उभे आहे. मुंबई ही कोळ्यांची आहे. त्यांचा विकास केला जाईल, त्यांना जादा एफएसआय दिला जाईल, अशी घोषणा आधीच्या सरकारने केली होती. प्रत्यक्षात काही झाले नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्री या नात्याने ठाण्यातील कोळी बांधवांच्या या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा आणि सीआरझेड रद्द करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)>कोळीवाड्याव्यतिरिक्त शेजारीच असलेल्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलाच्या परिसरात खाडीकिनारी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून इमारत उभी केली जाते. तसेच लगतच पोलिसांच्याही शासकीय निवासस्थानाच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. >केवळ महागिरी कोळीवाड्यातच सीआरझेड लागू केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणची घरेही विकसित करता येत नाहीत. ही बाब शहरातील मूळचे रहिवासी असलेल्या कोळी बांधवांवर अन्यायकारक असून त्यांच्या हक्कांवर घाला घालणारी आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
सीआरझेड रद्द करा
By admin | Published: August 24, 2016 5:06 AM