महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे. कोश्यारी यांच्यासोबतच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही महाराजांवर केलेल्या वक्तव्याचा विरोधकांकडून तीव्र विरोध होत आहे.
राज्यपालांच्या या विधानावर आता अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नाही, तर संपूर्ण देशाचे दैवत आहे. त्यामुळे कुणीही बोलताना विचार करुन बोलायला हवं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं मी वक्तव्य ऐकलं असून त्यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
सदर प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'जोपर्यंत चंद्र-सूर्य-तारे आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि देशाचे आदर्श असणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे झाले, तर छत्रपती शिवाजी महाराज, हेच आमचे हिरो आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही, राज्यपालांच्या मनातही याबद्दल शंका नसावी.'
काय म्हणाले होते भगतसिंह कोश्यारी?
'आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण ? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,' असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले होते.