प्रत्येक मराठी माणसाचा श्वास असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष उत्साहात साजरे करायचे आहे. या माध्यमातून शिवाजी महाराजांचे विचार जगभरात पोहोचावे असा मानस आहे. आगामी २ जून रोजी रायगडावर राज्य सरकारकडून आयोजित कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करुन सर्व शिवप्रेमीना सोबत घेऊन हा सोहळा भव्यदिव्य आणि देखणा व्हावा यासाठी शिस्तबद्ध तयारी सुरू आहे, अशी माहिती मंत्री आणि भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
संपूर्ण जगातील लोक या सोहळ्याकडे कुतुहलाने बघत आहेत. शिवाजी महाराज याचे व्यक्तिमत्व, पराक्रम आणि विचार नव्या पिढीसमोर ठेवण्याची ही एक संधी आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी वाघनखे लंडनहून भारतात आणण्याचा संकल्प केला असून यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान सुधीर मुनगंटीवर यांनी व्यक्त केले. जगभरात पसरलेल्या भारतीयांना शिवाजी महाराज यांच्याबद्दल नितांत आदर आहे, म्हणूनच मॉरिशस येथे महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला. त्याच धर्तीवर लंडनमध्येही पुतळा उभारावा, असं सुधीर मुनगंटीवरांनी सांगितले.
शिवराज्याभिषेकाच्या ३५० वर्षपूर्ती निमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १ जून ते ७ जून रायगडच्या पायथ्याशी जाणता राजा, शिवाजी महाराजांच्या शस्त्रांची गेट वे ऑफ इंडिया येथे प्रदर्शनी, गाव, तालुका, जिल्हा व विभाग पातळीवर प्रबोधनकार, कीर्तनकार यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे विचार घराघरांत व मनामनांत पोहोचविले जातील, अशी माहिती देखील सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.