ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांना पोलीस संरक्षण देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई हल्ल्यात शहीद झालेले तुकाराम ओंबळेंचा अपमान केला असे टीकास्त्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोडले आहे. कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास केलेल्या विरोधानंतर शिवसैनिकांनी या कार्यक्रमाचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकली होती. त्यांच्या या कृत्याने महाराष्ट्राची बदनामी झाल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. मात्र आज शिवसेना नेत संजय राऊत यांनी त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलेलाच नाही, उलट त्यांच्या विधानामुळेच महाराष्ट्राची बदनामी झाली, असे राऊत यांनी म्हटले आहे. ज्या पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी मुंबईत येऊन निरपराधांचे प्राण घेतले, ज्या कसाबला थोपवताना पोलिस तुकाराम ओंबळे शहीद झाले, त्याच पाकिस्तानच्या पराराष्ट्र मंत्र्यांना संरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी शहीद ओंबळेंचा अपमान केला, असे राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेनेने कसुरी यांच्या कार्यक्रमाला प्रखर विरोध दर्शवल्यावरही मुख्यमंत्र्यांनी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त पुरवण्याचा आदेश दिल्याने काल संध्याकाळी हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. मात्र यामुळे शिवसेना अजूनच संतप्त झाली असून सामनाच्या अग्रलेखातून सुधींद्र कुलकर्णी यांची पाकिस्तानी एजंट अशी संभावना करण्यात आली होती आणि आता खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरच शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे.