यदु जोशी - मुंबईदेवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्याचे मूल्यांकन करताना राज्य गुप्तचर विभागाने (सीआयडी) निवडक मंत्री वगळता इतरांच्या कामगिरीबाबत रेड अॅलर्ट दिला असून मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. नवीन सरकारला १०० दिवस पूर्ण होत असताना सीआयडीने जनतेला सरकारबद्दल काय वाटते या विषयीचा ‘फीड बॅक रिपोर्ट’ दिला आहे. नवीन सरकारने आणि विशेषत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी गतिमान आणि पारदर्शक कारभाराच्या संदर्भात तसेच औद्योगिक गुंतवणूक वाढण्याच्या दृष्टीने केलेल्या घोषणांबद्दल लोकांमध्ये चांगली प्रतिक्रिया असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण या सरकारमधील सर्व मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक आहे असे मात्र नाही. निवडक पाच-सहा मंत्र्यांची खात्यावर चांगली पकड बसली असली तरी अन्य कॅबिनेट मंत्री आणि एखाद-दोन अपवाद वगळता बहुतेक सर्व राज्यमंत्र्यांचा अद्याप जम बसायचा आहे, असे मत गुप्तचर यंत्रणेने नोंदविले आहे. एका ज्येष्ठ मंत्र्याने सीआयडीकडून असा ‘फीड बॅक’ मिळाला असल्याचे मान्य केले. सूत्रांनी असेही सांगितले की, नवीन सरकारच्या घोषणा अतिशय चांगल्या आहेत पण त्यांची अंमलबजावणीही नजीकच्या काळात दिसणे नागरिकांना अपेक्षित आहे. आधीच्या सरकाच्या तुलनेत या सरकारची विश्वासार्हता अधिक दिसते पण अंमलबजावणीच्या पातळीवर साशंकतादेखील बोलून दाखविली गेली. भाजपाचे मंत्री एकत्र बसणारच्राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि बाहेरही काही मंत्री करीत असलेल्या विधानांमुळे बरेचदा गोंधळ निर्माण होतो. भाजपाच्या मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, असे चित्र त्यातून निर्माण होते. एकनाथ खडसेंसारखे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याचेही वारंवार समोर येते. या पार्श्वभूमीवर, भाजपाच्या निदान काही ज्येष्ठ मंत्र्यांची मुख्यमंत्री दर आठवड्याला वा नियमितपणे बैठक घेतील आणि वादाच्या मुद्यांवर त्यात चर्चा होईल, अशी शक्यता आहे.
फडणवीस सरकारला सीआयडीचा रेड अॅलर्ट
By admin | Published: February 05, 2015 1:38 AM