लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील जवळपास दीडशे मतदारसंघातील हजारो मतदारांची नावे काढून टाकण्यात आली असून त्यापेक्षाही जास्त बोगस मतदारांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे, असा आरोप महाविकास आघाडीने निवडणूक आयोगावर केला आहे. हे भाजपचे षडयंत्र असून या विरोधात मतदारांचा विराट मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढण्याचा इशारा मविआने दिला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली होती. शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला ई-मेल करून मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जात असल्याची तक्रार केली. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही मतदारसंघांच्या नावांची यादीच वाचून दाखवत दलित, बौद्ध आणि मुस्लीम मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जात असल्याचा आरोप केला.
या मतदारसंघांतील मतदारांची नावे वगळल्याचा आरोप
शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला ईस्ट, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर, धामणगाव रेल्वे