आमदार, खासदारांसह प्रदेश पदाधिकाऱ्यांचीही पाठ नागपूर : काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात सारी शक्ती एकवटून देशभरात रेल रोको आंदोलन केले. नागपुरात मात्र या आंदोलनात काँग्रेसचे आमदार, माजी खासदार, माजी आमदार व प्रदेश पदाधिकारी फिरकले नाहीत. या आंदोलनाला उपस्थित राहण्याचे प्रदेश काँग्रेसचे निर्देश होते. मात्र, नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेश काँग्रेसच्या आदेशाचाही अनादर केला. २५ जून रोजीच्या रेल रोको आंदोलनात आमदार, खासदार, माजी आमदार, खासदार, प्रमुख नेते, आघाडी संघटनांचे प्रमुख, सेल व विभागांचे अध्यक्ष यांनी सहभागी व्हावे, असे पत्र प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांच्या स्वाक्षरीने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना प्राप्त झाले होते. मात्र, त्याची नेत्यांनी दखल घेतली नाही. खा. अविनाश पांडे, माजी खा. विलास मुत्तेमवार, आ. दीनानाथ पडोळे, माजी मंत्री अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी, प्रदेश सचिव जयप्रकाश गुप्ता यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी, काही नगरसेवक आंदोलनात सहभागी झालेच नाहीत. केंद्रात सरकार हातून गेले, आता आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला हाताशी धरण्याची असलेली संधीही काँग्रेस नेते गमावत आहे. असेच सुरू राहिले तर विधानसभेतही जनता हात दाखविल्याशिवाय राहणार नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँगे्रसला नागपूर शहरात सहापैकी फक्त दोन जागा जिंकता आल्या. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार पटापट आपटले. आता लोकसभेच्या निवडणुकीत तर जनतेने भाजपला एकतर्फी कौल दिला. सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपला भरभरून आघाडी मिळाली. ही लीड पाहता काँग्रेसचे नेते भानावर येतील, जनतेशी संपर्क वाढवतील, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरतील, आंदोलनांमध्ये सहभागी होतील,अशी अपेक्षा होती. मात्र, ठेच लागल्यानंतरही नेते चूक सुधारायला तयार दिसत नाही. आमचे नेते फक्त लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट मागण्यासाठी, तिकीट मिळाल्यावर प्रचार संपेपर्यंतच सक्रिय असतात. पक्षाने दिलेला कार्यक्रम राबविण्यात, आंदोलनात सहभागी होण्यास त्यांना रस नसतो, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते व्यक्त करीत होते. (प्रतिनिधी)
रेल रोको आंदोलनातून काँग्रेस नेते गायब
By admin | Published: June 27, 2014 12:34 AM