“मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ”; जळगाव दुर्घटनेवरून काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 21:02 IST2025-01-22T21:00:22+5:302025-01-22T21:02:26+5:30
Congress Nana Patole Reaction On Jalgaon Railway Accident: जळगाव रेल्वे अपघातावरून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

“मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ”; जळगाव दुर्घटनेवरून काँग्रेसची टीका
Congress Nana Patole Reaction On Jalgaon Railway Accident: पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन कर्नाटक एक्सप्रेस आली. या ट्रेनखाली येऊन जवळपास १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ही भीषण घटना पाचोरा ते परधाडे दरम्यान घडली. यात ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरून आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली असून, काँग्रेसने या प्रकरणी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
माहिजी-परधाडे स्थानक येण्यापूर्वी एका बोगीत चैन ओढली गेली. त्यानंतर वेगात असलेल्या रेल्वेगाडीने अचानक ब्रेक दाबायला सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेरुळांवर ठिणग्या उडत गेल्या. परधाडे स्टेशनवर रेल्वेगाडी थांबली. तेव्हा एका बोगीतील प्रवाशांना या ठिणग्या दिसल्यावर बोगीत आग लागली असावी, या शक्यतेने ५० ते ६० जण समोरच्या रुळावर धावले. तशातच समोरुन वेगात कर्नाटक एक्स्प्रेस आली. त्यावेळी रुळावरच्या प्रवाशांची धावाधाव सुरु केली असतानाच काही जण रेल्वेखाली चिरडले गेले, असे म्हटले जात आहे.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ झालेली आहे. यात निर्दोष लोकांचा जीव जात आहे. पंतप्रधान मोदी यांचे सरकार योजना आणण्याच्या घोषणा करतात. कोणाचा जीव जाणार नाही, असे दावे करतात. कवच नावाची योजना आणणार असल्याचेही सांगितले जाते. परंतु, त्याचा किती उपयोग होत आहे, हे स्पष्ट आहे. कवच योजना ही जुमलेबाजी आहे. उलट आमच्या सरकारच्या कार्यकाळात रेल्वेची तिकिटे स्वस्त होती. आता मोदी सरकारच्या कार्यकाळात तिकीट दर तर वाढवण्यात आले आहेतच. पण लोकांचा जीवही जात आहे. हे प्रकार अजून किती होत राहणार, असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला.
दरम्यान, रेल्वे अपघातांवर केंद्र सरकारचे नियंत्रण नाही. केंद्र सरकार त्यांच्या मित्रांची मालगाडी अधिकाधिक कशी धावेल, हे पाहत आहे. मित्रांचा फायदा कसा होईल, हे पाहत आहे. सामान्य प्रवाशांसाठी असलेल्या प्रवासी रेल्वेचा अशा प्रकारे अपघात होणे दुर्दैवी आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.