Nana Patole: “सत्ता गेल्याने होणारी तडफड देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातून दिसली”; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 02:53 PM2022-05-02T14:53:08+5:302022-05-02T15:27:06+5:30

Nana Patole: भाजप विध्वंस करणारा पक्ष असून, अयोध्यातील बाबरी मशिद आम्हीच पाडल्याच्या फुशारक्या मारतायत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

congress nana patole replied bjp devendra fadnavis and mns raj thackeray after sabha | Nana Patole: “सत्ता गेल्याने होणारी तडफड देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातून दिसली”; नाना पटोलेंची टीका

Nana Patole: “सत्ता गेल्याने होणारी तडफड देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातून दिसली”; नाना पटोलेंची टीका

googlenewsNext

मुंबई: भोंग्याचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. या प्रकारामुळे राज्याची बदनामी तर होत आहेच पण गुंतवणुकीवरही परिणाम होईल आणि रोजगार निर्मितीला खिळ बसण्याचा धोका आहे. घटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यात जर कोणी अडथळे आणत असतील त्यांच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी व महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी चालवलेला हा तमाशा बंद करावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

सर्व धर्मियांना त्यांचे सण, उत्सव साजरे करण्याचे स्वातंत्र्य घटनेने दिले आहे. जे लोक दुसऱ्या धर्माच्या आड येतात. रमाजानसारख्या पवित्र सणात अडथळे आणत असतील तर त्यांच्यावर राज्य सरकारने कडक कारवाई केली पाहिजे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. सुप्रीम कोर्टाचे भोंग्याबाबत जे निर्देश आहेत, त्याप्रमाणे सरकार कारवाई करत आहे. पण त्याचा बाऊ करून जर कोणी राज्यात अशांतता निर्माण करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

तरुणांना रोजगार देण्याचा विचार करावा  

राज्यात धर्मिक अस्थिरता निर्माण करून राज्याच्या विकासाला खिळ घालण्याचे काम केले जात आहे. राज ठाकरे यांनी तरुणांची माथी भडकवण्यापेक्षा त्यांच्या हाताला रोजगार देण्याचा विचार करावा. राज ठाकरे यांना पुढे करून भाजपा केंद्रातील मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी वापर करत आहे. केंद्रातील सरकारला राज ठाकरे यांनी जाब विचारला पाहिजे परंतु दुर्दैवाने त्यांच्या भाषणात सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर एकही शब्द नव्हता. भारतीय जनता पक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्याचा वापर करुन घेत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अडीच वर्षापूर्वी सत्ता गेल्यापासून राज्यातील भाजपच्या नेत्यांना झोप येत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी बुस्टर सभेच्या नावाखाली घेतलेल्या सभेतील त्यांचे भाषण हे केवळ सत्तेवाचून त्यांची होत असलेली तडफड दाखवणारी होती. अयोध्यातील बाबरी मशिद आम्हीच पाडली अशा फुशारक्या ते आता मारत आहेत. अयोध्येतील मशिद भाजपने पाडली असे त्यांचे म्हणणे खरे धरले तरी त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. मुळात भारतीय जनता पक्ष हा विध्वंस करणारा, आहे ते पाडणारा, तोडणारा पक्ष आहे, त्यांच्याहातून चांगले काही निर्माण होऊच शकत नाही, काँग्रेस पक्ष मात्र नेहमीच जोडणारा, नवे निर्माण करणारा पक्ष आहे, काँग्रेस तोडफोडीच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.
 

Web Title: congress nana patole replied bjp devendra fadnavis and mns raj thackeray after sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.