"काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी’’, मढी येथील मुस्लिम दुकानदारांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:08 IST2025-03-07T19:08:19+5:302025-03-07T19:08:54+5:30
Harshavardhana Sapkal News: काही दिवसांपूर्वी मढीच्या ग्रामपंचायतीने एक बेकायदेशीर ठराव करून मढीच्या यात्रेत मुस्लीम समाजाच्या दुकानदारांना दुकाने लावण्याची परवानगी देणार नाही, असे म्हटल्याचे व सत्ताधारी पक्षातील मंत्र्याने या असंवैधानिक आणि बेकायदेशीर ठरावाचे समर्थन केले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आज या दुकानदारांशी चर्चा करून आपण घाबरू नये, काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास दिला

"काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी’’, मढी येथील मुस्लिम दुकानदारांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतली भेट
अहिल्यानगर/मुंबई - महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची थोर परंपरा आहे. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच वागावे अशी आपली शिकवण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची लढाई ही केवळ सत्तापरिवर्तनासाठी नाही तर व्यवस्था परिवर्तनासाठीही होती, स्वातंत्र्यानंतर देश संविधानाने चालत आला, पण आज केंद्र व राज्यातील सरकार हे संविधान विरोधी असून ब्रिटिशांप्रमाणे फोडा व राज्य करा ही या सरकारची निती आहे. सत्ताकारणीसाठी जाती जातीत समाजात विभाजन करून त्यांना एकमेकांविरोधात उभे केले जात आहे त्यामुळे सद्भावना सौहार्दाची पुर्नस्थापना करण्यासाठी काँग्रेस पक्ष सद्भावना पदयात्रा काढत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी येथे कानिफनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले व तेथील दुकानदारांची भेट घेऊन चर्चा केली. काही दिवसांपूर्वी मढीच्या ग्रामपंचायतीने एक बेकायदेशीर ठराव करून मढीच्या यात्रेत मुस्लीम समाजाच्या दुकानदारांना दुकाने लावण्याची परवानगी देणार नाही, असे म्हटल्याचे व सत्ताधारी पक्षातील मंत्र्याने या असंवैधानिक आणि बेकायदेशीर ठरावाचे समर्थन केले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आज या दुकानदारांशी चर्चा करून आपण घाबरू नये, काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास दिला यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अहिल्यानगर जिल्ही काँग्रेसचे अध्यक्ष जयंत वाघ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रविद्रं दळवी, भगवान गडाचे विश्वस्त व काँग्रेस नेते राजेंद्र राख, प्रदेश सरचिटणीस, रामचंद्र आबा दळवी, दादासाहेब मुंडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर अहिल्यानगर व भगवानगड येथे प्रसार माध्यमांशी बातचीत केली, यावेळी काँग्रेस प्रांताध्यक्ष म्हणाले की, राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, कोयता गँग, रेती गँग,मुरुम गँग, आका, अशा गँग बनल्या आहेत. सत्ता मिळवण्यासाठी जाती धर्मात विष कालवून सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे, द्वेष, मत्सर, गुंडागर्दी वाढून सामाजिक समतोल बिघडला असताना सरकार मात्र गप्प आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे. सद्रभावना यात्रा व निवडणूका याची काही संबध नाही. समाजात बिघडलेला ताणाबाणा, वाढलेली विषमता ही चिंताजनक आहे म्हणून राज्यात सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी सद्भावना यात्रेचे आयोजन केले आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
उद्या शनिवारी ८ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग येथे स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेवून ५१ किलोमीटरच्या सद्भभावना पद यात्रेला सुरुवात करतील. दोन दिवस प्रवास करून ही पदयात्रा रविवारी ९ मार्च रोजी सायंकाळी बीड येथे पोहोचेल. तिथे सद्भावना मेळाव्याने पदयात्रेची सांगता होणार आहे.