Congress Vijay Wadettiwar News: विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर असा लौकिक असलेल्या पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षाच्या तरुणीवर एका नराधमाने अमानुष अत्याचार केला. मंगळवारी पहाटे घडलेल्या या पाशवी घटनेने लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याने पुणे हादरले असून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावरून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. स्वारगेट बस स्थानकात झालेली घटनेची जबाबदारी सरकार आणि एसटीने स्वीकारली पाहिजे. घटना घडली तेव्हा तिथे असलेली यंत्रणा काय करत होती. रिकाम्या बसमध्ये जे काही मिळाले आहे, ते धक्कादायक आहे. त्या ठिकाणी चार रिकाम्या बस महिलांच्या शोषणसाठी वापरल्या जात होत्या का? असा प्रश्न निर्माण होतो. गृह विभागाची इभ्रत रोज चालली आहे, ती वेशीवर टाकल्यासारखी स्थिती झाली आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
सरकार सत्तेत दंग, महिलांची चिंता नाही
सरकार सत्तेत दंग आहे. सरकारला महिलांची चिंता नाही. पुण्यातील या घटनेचा मुद्दा आम्ही विधानसभा अधिवेशनात मांडू. गृह विभागाचा आणि कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. पुणे शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक नगरी असली, तरी मुलींच्या बाबतीत अत्यंत धोक्याचे शहर झाले आहे. महाराष्ट्र शक्ती कायद्याची कठोर अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
दरम्यान, अशा घटना वारंवार घडत आहेत. सरकार या घटनांवर गंभीर आहे की नाही? हा प्रश्न उपस्थित होतो. फक्त म्हणत आहेत की, आम्ही कारवाई करू. आम्ही अटक करू. परंतु ते काही करत नाहीत. महिलांच्या शोषणामध्ये वाढ होत चालली आहे, या शब्दांत वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.