"पवार साहेबांचा पक्ष चोरून..."; पुण्यातल्या पुरावरुन मनसे-राष्ट्रवादीत जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 10:31 AM2024-07-30T10:31:29+5:302024-07-30T10:42:14+5:30

Pune Flood : पुण्यातल्या पुरपरिस्थितीवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला होता

Controversy between MNS and NCP due to criticism over rains in Pune | "पवार साहेबांचा पक्ष चोरून..."; पुण्यातल्या पुरावरुन मनसे-राष्ट्रवादीत जुंपली

"पवार साहेबांचा पक्ष चोरून..."; पुण्यातल्या पुरावरुन मनसे-राष्ट्रवादीत जुंपली

Raj Thackeray : पुण्यात आलेल्या पुरामुळे एकीकडे लोकांचे प्रचंड नुकसान झालेलं असताना दुसरीकडे राजकारण सुरु झालं आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुराच्या घटनेवरुन प्रशासनावर निशाणा साधला. मुसळधार पावसानंतर पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे  एकतानगरी, निंबजनगर, विठ्ठलवाडी हे भाग पाण्याखाली गेले होते. यावेळी राज ठाकरे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. त्यावर राष्ट्रवादीने प्रत्युत्तर देताच मनसेने थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

पुण्यातल्या पावसाच्या घटनेनंतर राज ठाकरे यांनी पुणेकरांशी संवाद साधत पत्रकार परिषद घेतली. "एवढं पाणी सोडतील याची लोकांना कल्पनाही नव्हती. घरांमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे. मला वाटत शासनाने या गोष्टींचा विचार करायला हवा. मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, पुण्याला वेळ लागणार नाही. प्रशासनाचे नियोजन दिसून येत नाही. पुणे हे एक शहर नाही, पाच पाच शहरं झाली आहेत. राज्यामधली लोक भिका मागतात आणि बाहेरचे येऊन राहतात याला काही सरकार चालवणं म्हणतात का?," असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. यासह अजित पवारांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला होता.

राज ठाकरेंच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्षांवर शा‍ब्दिक हल्ला केला. दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबद्दल सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण या सुपारीबहाद्दरांचं टोलनाक्याचं, भोंग्याचं किंवा इतर कोणतंही आंदोलन यशस्वी झालं नाही. आतापर्यंत सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

मिटकरींच्या या टीकेला मनसे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गजानन काळे यांनी एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत भाष्य केलं आहे. "७० हजार कोटींचा घोटाळा करून नुसते पान सुपारी नाही तर महाराष्ट्राला चुना लावला अजित दादांनी (हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.) तरी घासलेट चोर वर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय. अजितदादांच्या घरातल्या सदस्यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि कसल्या राज ठाकरे यांच्या यश अपयशाच्या बाता मारतो रे घासलेट चोर? हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष काढून २ आमदार निवडून आणावेत तुमच्या दादांनी, मग जाहीर मिशी कापून तुझ्या हातात देवू," असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे. तसेच उगाच पवार साहेबांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका. पक्ष चोरून पण १ खासदार निवडून आणताना दमछाक झाली तुमच्या दादांची. ते सुनील तटकरे पण स्वतःच्या हिम्मतीवर आले, असंही काळेंनी म्हटलं.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

"पाऊस पडणं आपल्या हातात नाही पण असा पाऊस  पडल्यानतंर दरवाजे उघडले जातील त्याचा लोकांना त्रास होणार नाही याचं कोणतं प्लॅनिग केलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक तर पुण्याचे आहेत. ते नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं. त्यांनी यात लक्ष घालायला नको का?" असा टोला राज ठाकरेंनी लगावला होता. 

Web Title: Controversy between MNS and NCP due to criticism over rains in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.