परभणी : नानलपेठ पोलिसांच्या ताब्यात असलेल्या युवकाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून सुरू झाला असून त्याची खातेनिहाय चौकशीही स्वतंत्ररित्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत सुरू झाली आहे़ श्रीरामपूर येथील एका चोरीच्या प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी रविवारी समशेर खान यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते़ त्याच दिवशी सायंकाळी त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच समशेर खान याचा मृत्यू झाला असून, दोषींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली होती.रविवारी रात्री शासकीय रुग्णालय परिसरात संतप्त जमावाने दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला होता़सोमवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात न्यायाधीश आणि उपविभागीय अधिकाऱ्यांसमक्ष समशेर खान याचे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले़ त्यानंतर मध्यरात्री त्यांचे पार्थिव परभणी शहरात आणण्यात आले़ मंगळवारी सकाळी त्याचा दफनविधी करण्यात आला़ शहरातील विविध संवेदनशील भागात एसआरपीएफ, डीएसबी, स्थानिक गुन्हा शाखा, दहशतवाद विरोधी पथक असा २०० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात होता़ (प्रतिनिधी)
कोठडीत युवकाचा मृत्यू; सीआयडी तपास सुरू
By admin | Published: December 28, 2016 1:27 AM