ऑनलाइन टीम
लखनौ, दि. २७ - २००४ च्या लोकसभा निवडणुकीत माझ्या पराभवासाठी अंडरवर्ल्ड जबाबदार होते असे खळबळजनक विधान भाजप नेते व उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केले.२००४ च्या लोकसभा निवडणुकीत राम नाईक यांचा काँग्रेस उमेदवार आणि अभिनेता गोविंदा याने पराभव केला होता.
उत्तरप्रदेशच्या राज्यपालपदी विराजमान झाल्यावर राम नाईक यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखात दिली आहे. या मुलाखातीमध्ये त्यांनी २००४ च्या पराभवाविषयी भाष्य केले. नाईक यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पेट्रोलियम आणि रेल्वे राज्यमंत्री पद सांभाळले आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत राम नाईक यांना गोविंदाने धूळ चारली होती. याविषयी राम नाईक म्हणाले, २००४ मध्ये माझा पराभव व्हावा यासाठी अंडरवर्ल्डने मोर्चेबांधणी केली होती. आज मी जे बोलले ते पराभवाचे कारण दिल्यासारखे होईल. पण अंडरवर्ल्डच पराभवासाठी जबाबदार होते.मी पाच वेळा खासदारकीसाठी लढवली होती. आता नवीन चेह-यांना संधी मिळावी यासाठी मी यंदा निवडणूक लढवली नाही असे राम नाईक यांनी सांगितले.
राज्यपालपद ही राजकीय नेमणूक असते. केंद्रात सत्ताबदल झाल्यावर राज्यपालांनी तातडीने राजीनामा देणे अपेक्षीत असते. मात्र दुर्दैवाने यंदा सत्ताबदल होऊनही काही जण पदाला चिकटून बसले आहेत अशी टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.