मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सरळ सेवा भरती २०१२ अंतर्गत विविध विभागांतून भरती झालेल्या चालकांनी मूळ विभागात बदली करण्याची मागणी करत मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.मुंबई प्रदेशात नोकरी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने भरती केलेल्या विभागात बदली करण्याची त्यांची मागणी आहे. संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, अनेक विभागांमध्ये झालेल्या भरतीमध्ये प्रशासनाला मुंबई प्रदेशामध्ये आवश्यक चालक मिळाले नाहीत. परिणामी इतर विभागांतील ९२९ चालकांनी नवी भरती होईपर्यंत मुंबई प्रदेशात काम करण्याचे आदेश देण्यात आले. मुंबई प्रदेशात आवश्यक भरती झाल्यानंतर चालकांना पुन्हा मूळ भरती केलेल्या ठिकाणी बदली करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. (प्रतिनिधी)मुंबई, ठाणे, पालघर व रायगड या विभागात चालकांना योग्य काम मिळत नसल्याने ३० पैकी २० दिवसच रोजगार मिळत आहे. परिणामी ५ ते ६ हजार रुपयांवर काम करणे कठीण झाल्याचे चालकांचे म्हणणे आहे. तरी एसटी प्रशासनाकडून राज्यातून नव्याने ७ हजार ७०० चालकांची भरती करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संघटनेने सांगितले.
मूळ विभागात बदलीची एसटी चालकांची मागणी
By admin | Published: March 18, 2015 1:49 AM