धनंजय मुंडे यांचा आंदोलनाचा इशारा
बीड : भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूसंदर्भातील चौकशीत सीबीआय करीत असलेला विलंब आणि अक्षम्य दिरंगाई याबद्दल जनतेत नाराजी वाढत असून, तीव्र भावना व्यक्त होत आहेत. यासंदर्भात त्यांचे पुतणो तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. धनंजय मुंडे यांनीही आपली नाराजी व्यक्त करताना दिल्लीत सीबीआय कार्यालयासमोर या दिरंगाईबद्दल आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित जनसमुदायात मोठय़ा प्रमाणावर क्षोभ उसळला होता. त्याचा फटका उपस्थित भाजपा नेत्यांनाही सहन करावा लागला. मुंडे यांच्या अपघाती मृत्यूसंदर्भात सीबीआय करीत असलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे आमच्याही मनात संशयाची सुई निर्माण झाली आहे. तातडीने तपास झाला नाही, तर कोणत्याही थराला जाऊन आंदोलन करण्याची तयारी केली आहे, अशा शब्दांत आ. धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूला अडीच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात आजवर कोणी पुढे येऊन बोलतही नाही. वेळेत हा तपास झाला असता तर सत्य नेमके काय आहे, हे समोर आले असते.
मुळात आमचा वंजारी समाज हा भावनिक असून त्यांच्या भावनांशी केंद्र सरकारने सुरू ठेवलेला हा खेळ म्हणजे थट्टाच आहे. ज्या दिवशी मुंडे यांचे अपघाती निधन झाले, त्याच दिवशी मी स्वत: आ. पंकजा पालवे यांना एकच प्रश्न उपस्थित केला होता की, मुंडे कुटुंबातील कोणीही दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच शवविच्छेदन झालेच कसे?
सीबीआय चौकशीची आमची मागणी सुरूवातीपासूनच राहिली असून याचा अहवाल लोकांसमोर आला नाही तर दिल्लीत सीबीआयसमोर आंदोलन करण्याची तयारी केली आहे. ही दिरंगाई जाणीवपूर्वक होत असल्याचा संशय व्यक्त करीत धनंजय मुंडे म्हणाले, आमच्या मनात या अपघातामुळे घातपाताचा संशय जरूर निर्माण झाला आहे. परंतु आम्ही केंद्र सरकारकडे इतकीच मागणी केली आहे की, याची चौकशी करुन सत्य समोर आणावे. परंतु होणारा विलंब पाहिला की आमच्या सारख्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली तर ते चुकीचे आहे, असे म्हणता येणार नाही.