सावंतवाडी : ‘सनातन’वर बंदी घालणे योग्य नाही, सनातनने काय खून केलेले नाहीत, मग बंदी कशासाठी? असा प्रश्न भाजपाचे प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण यांनी शनिवारी उपस्थित केला. पाकिस्तानी गझलकार गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करून शिवसेनेने आपली अपरिपक्वता दाखवली. कार्यक्रम रद्द करण्याच्या विरोधात भाजपा असून, आम्ही याचे कदापिही समर्थन करणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.वैभववाडी व दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीसाठी पक्षनिरीक्षक म्हणून मधू चव्हाण यांची नेमणूक केली असून, या दोन्ही नगरपंचायतींच्या निवडणूक कामाचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. यावेळी काही काळ ते सावंतवाडीतील विश्रामगृहावर थांबले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.चव्हाण म्हणाले, ‘भाजपा आणि शिवसेना मित्रपक्ष असून, आमचे सरकार पाच वर्षांचा कालावधी व्यवस्थित पूर्ण करेल. आमच्यात काही भांडणे असतील, पण ती टोकाची नाहीत. ही धुसफूस होत राहणारच. राज्यमंत्र्यांना अधिकार मिळत नाहीत असे नाही, स्वतंत्र अधिकार देण्यात येणार नाहीत. भारतीय राज्यघटनेत असे अधिकार नाहीत, पण आजही भाजपाचा कोणताही कॅबिनेट मंत्री शिवसेनेच्या मंत्र्याचे अधिकार डावलत नाही.’इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात शिवसेनेला योग्य ते स्थान दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बीडला जात आहेत, त्यामुळे शिवसेनेची नाराजी असण्याचा कोणताही प्रश्नच येत नसल्याचे मत मधू चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
‘सनातन’ संस्थेवर बंदी नकोच!
By admin | Published: October 12, 2015 5:32 AM