पुणे : पावसाळा सुरू होऊन अडीच दोन महिने उलटल्यानंतरही मराठवाडयात अजून दमदार पाऊसच न झाल्याने विभागातील दुष्काळी स्थिती अधिक तीव्र झाली आहे. आतापर्यंत मराठवाडयात सरासरीच्या ५८ टक्के पाऊस कमी पडला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आतापर्यंतच्या पावसाच्या स्थितीवरून मराठवाडयाला दुष्काळग्रस्त भाग संबोधले आहे.मराठवाडा वगळता राज्यात सगळीकडे चांगला पाऊस होत आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने सरासरी गाठली आहे. कोकणात सरासरीच्या केवळ ७ टक्के पाऊस कमी आहे. त्यापाठोपाठ मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या १२ टक्के आणि विदर्भात सरासरीच्या १८ टक्के पाऊस कमी पडला आहे. चांगल्या पावसामुळे या भागांतील धरणांमध्येही चांगला पाणीसाठा झाला असून पिण्याच्या पाण्याचे संकटही दूर झाले आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने राज्यभर दुष्काळी स्थिती होती. पण जुलै महिन्यात झालेल्या पावसाने कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील तूट वेगाने भरली. पण या काळातही मराठवाड्यात मात्र पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नाही. (प्रतिनिधी)
मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग
By admin | Published: August 13, 2014 2:28 AM