अहमदनगर : राज्यातील दुष्काळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे, अशी टीका करून याबाबत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. गेल्या १५ वर्षांत तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणत्याच उपाययोजना राबविल्या गेल्या नाहीत, असेही ते म्हणाले.नगर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातील दुष्काळी स्थिती पाहता चारा टंचाई, कर्जाचे पुनर्गठण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफी आदी निर्णय सरकारने घेतलेले आहेत. असे असताना त्याच मागण्यांसाठी राष्ट्रवादी आंदोलन करीत आहे, हे हास्यापद आहे.भाजपा सरकारला शेतीमधले काय कळते, असे विचारणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? शेतीमधले काहीही कळत नाही, अशा सोनिया गांधी यांनी शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणल्या. मात्र फार काही कळत असूनही शरद पवार यांनी मात्र काहीच केले नाही. पश्चिम घाटाकडून अरबी समुद्राकडे वाहत जाणारे पश्चिमेचे पाणी पूर्वेच्या गोदावरी खोऱ्यात आणण्याबाबत बाळासाहेब विखे यांच्या भूमिकेशी सहमत आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
राज्यातील दुष्काळ राष्ट्रवादीचे पाप - खडसे
By admin | Published: September 19, 2015 4:14 AM