अकोले (अहमदनगर) : सरपंचाने पुनर्विवाह केल्याचे कारण पुढे करत थेट त्यांच्या पत्नीलाच मंदिर प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना तालुक्यातील सुगाव खुर्द येथे घडली. महाराष्ट्र दिनाच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. घटनेनंतर गावात तणाव असून मंदिरात प्रवेश नाकारणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी सुगावच्या ग्रामसभेत समन्वय समिती स्थापन करण्यात आली. १ मे रोजी ग्रामसभेत तोडगा निघेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.सुगाव खुर्द येथील सरपंच महेश वैद्य यांनी पहिल्या पत्नीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर पुनर्विवाह केला आहे. २४ एप्रिलला गावातील ‘काशाई’ देवीच्या यात्रेत पूजा करण्यावरुन काही वयोवृद्ध व्यक्तींनी वैद्य यांच्या पत्नी निर्मला यांना धक्काबुक्की करीत मंदिराबाहेर काढले. त्याबाबत अकोले पोलीस ठाण्यात किसन कारभारी वैद्य (८०) यांच्याविरुद्ध भादंवि कलम १०७ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. समन्वयाने मार्ग काढण्यासाठी भाऊसाहेब वैद्य, अमोल वैद्य, लक्ष्मण वैद्य, सुभाष वैद्य, रोहिदास वैद्य, माधव वैद्य, सखाराम वैद्य, पुंजा वैद्य, विष्णूपंत वैद्य यांची ९ जणांची समिती नेमण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पुनर्विवाहामुळे मंदिर प्रवेश नाकारला
By admin | Published: April 29, 2017 2:22 AM