नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात नागपूर विभागात सध्या पाणीटंचाईची झळ जाणवत नसली तरी आगामी काळात पाणीटंचाई भीषण होण्याची शक्यता आहे़ अमरावती विभागाचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही़ चार गावांमध्ये ७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर ६ तालुक्यांमध्ये पाणीपातळीत घट झाली आहे.सहा जिल्ह्यांतील १९४२ गावे आणि ११ वाड्यांना टंचाईसदृश घोषित करण्यात आले आहे. नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये फक्त ३२ टक्के तर अमरावती जिल्ह्यात ३६.५२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. विभागातील काही जिल्ह्यांची भूजल पातळी घटली, तर काही जिल्ह्यांत वाढली आहे. सध्या विभागात फक्त नागपूर जिल्ह्यातील २ गावांत ३ टँकर सुरू आहेत. मागील वर्षी या काळात एकही टँकर सुरू झाला नव्हता. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांतील १९४२ गावांमध्ये टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत़ तसेच ६३ तालुक्यांत भूजल पातळी खोल गेली आहे. त्यापैकी ३९ तालुक्यांत ० ते १ मीटर, २ तालुक्यांत १ ते २ मीटर, एका तालुक्यात २ ते ३ मीटर तर उर्वरित तालुक्यांमध्ये यापेक्षा अधिक घट आहे. नागपूर विभागात ४० मध्यम प्रकल्प आहेत. त्यात १३ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी ३१ टक्के होता. या वर्षी ७४ एमएलडी साठा आहे. २०१४मध्ये १७० एमएलडी, २०१३मध्ये १०३ एमएलडी पाणीसाठा होता.
पूर्व विदर्भात १९४२ गावांना टंचाईच्या झळा!
By admin | Published: April 13, 2015 5:07 AM