भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गा शेजारी मदनवाडी ब्रिजलगत असणाऱ्या वीज मंडळाचे पोल अतिशय धोकादायक स्थितीत उभे आहेत. वादळी वारा , पावसामुळे मोठ्या अपघाताचा धोका संभवतो.पुणे-सोलापूर महामार्गाचे काम होत असताना लगतच्या पोलचे स्थलांतर करण्यात आले होते.भिगवण गाव आणि शेती पंप यांना विद्युत पुरवठा करणारी २२ के.व्ही.ची लाईन शिफ्ट करून रस्त्याच्या पश्चीम बाजूला असणाऱ्या डोंगर टेकडी वरून ही लाईन नेण्यात आली होती.परंतु रस्त्याच्या रुंदीकरणात ही टेकडी कापण्यात आली.त्यामुळे या पोल शेजारी जागा कमी प्रमाणात शिल्लक राहिली.सध्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाचे दिवस आहेत. यात हे खांब कोसळण्याचे शक्यता आहे. तसेच या पोल वर डबल सर्किट लाईन जात असल्याने धोक्याचे प्रमाण जादा आहे. याबाबत वीज मंडळ दिसूनही डोळेझाक करीत आहे. तसेच पोल महामार्गावर पडण्याची भीती आहे. यावेळी चालू असणारी वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे. याविषयी वालचंदनगरचे उपकार्यकारी अभियंता आर. एन. गोफणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यात ठेकेदाराचा दोष असल्याचे सांगितले. तसेच यावर तातडीने निर्णय घेवून काम करणार असल्याचेही सांगितले.
विद्युत वाहक तारांचे पोल धोकादायक स्थितीत
By admin | Published: May 17, 2016 2:07 AM