मुंबई : एसटी महामंडळात गेल्या तीन वर्षांपासून विभागीय बढती समितीची बैठकच पार पडलेली नाही. त्यामुळे राज्यातील १८0 कर्मचारी, अधिकाऱ्यांची बढती रखडल्याचे समोर आले असून त्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. या समितीची बैठक होणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे. एसटी महामंडळात विभागीय बढती समिती असून, कर्मचारी, अधिकाऱ्यांची बढती या समितीमार्फत होते. या समितीवर एसटीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, परिवहन आयुक्त, कामगार आयुक्त, शासनाचा प्रतिनिधी म्हणून एक मागासवर्गीय अधिकारी आणि एसटीच्या महामंडळाचा एक सदस्य असतो. जीवनराव गोरे हे एसटीचे अध्यक्ष असताना त्यांच्या काळात आॅक्टोबर २0१२मध्ये समितीची बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मे २0१३मध्ये बढतीचा निकाल लावण्यात आला आणि अनेकांची बढती झाली. त्यानंतर एसटीत अनेक कर्मचारी, अधिकारी निवृत्त होत गेले. परंतु या निवृत्तीनंतर झालेल्या रिकाम्या जागा एसटीकडून भरल्याच गेल्या नाहीत. तेव्हापासून १८0 जणांची बढती रखडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यामध्ये विभागीय नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, मॅकेनिकल इंजिनीअर, सुरक्षा अधिकारी, अकाउंट अधिकारी, कर्मचारी वर्ग व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाव्यवस्थापकसारख्या पदांवरही काही जणांना तात्पुरती बढती दिली आहे. यामुळे एसटीचा कारभार ढिसाळ होण्यास हे एक महत्त्वाचे कारण ठरत असल्याचे सांगण्यात आले. सध्या एसटी महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापक या पदाचा तात्पुरता कारभार हा व्ही. रत्नपारखी यांच्याकडे दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते हा कारभार बघत असून, त्यांच्याकडे उपमहाव्यवस्थापक पदाचा कारभार आहे. महाव्यवस्थापक कर्मचारी वर्गाचा तात्पुरता कार्यभार हा डी.आर. पंचवाघ यांच्याकडे आहे. त्यांचे सध्याचे पद हे उपमहाव्यवस्थापक असे आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांची बढती रखडली
By admin | Published: October 14, 2015 3:48 AM