ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच त्यांनी विशाळगडाकडे कूच करण्याची घोषणाही केली होती. त्यानंतर विशाळगडावर शिवभक्तांनी अनेक अतिक्रमाणांची तोडफोड केली होती. तसेच या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर सरकारने अतिक्रमाणांविरोधात कारवाई करण्याच्या दिशेने पावलं टाकली होती. तसेच विशाळगडाच्या परिसरात हिंसक तोडफोड करणाऱ्या अनेक शिवभक्तांवर गुन्हेही दाखल केले होते. तसेच विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही टीका झाली होती. दरम्यान, आता या सर्व टीकाकारांना संभाजीराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. गडावर अतिक्रमण होते हे सगळ्यांनाच मान्य आहे, मग वेळीच ते काढून का घेतले नाही? शिवभक्तांची वाट बघत होता का? हे प्रश्न या अतिक्रमणांचा पुळका येणाऱ्यांना पडत नाहीत का?, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, अतिक्रमण करणे ही बाब कोणत्या कायद्यात बसते, हे अतिक्रमण केलेल्यांचा पुळका येणाऱ्यांनाच माहिती! आम्ही कायदा पाळणारे आणि कायद्याचा सन्मान करणारे राष्ट्रभक्त भारतीय आहोत. सरकारने विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करावे, ही आमची मागणी होती आणि या मागणीची उशीरा का असेना पण दखल घेऊन दुसऱ्याच दिवशीपासून विशाळगडावरील अतिक्रमणे जमीनदोस्त होण्यास सुरुवात झाली. यावेळी गडपायथ्याला उपस्थित शिवभक्तांनी सविनय मार्गानेच आपली मागणी मांडण्याचे आवाहन आम्ही वेळोवेळी करत होतो आणि शिवभक्तांनी यास सकारात्मक प्रतिसाद देखील दिला. इतर काही अनुचित प्रकार घडले त्याचे समर्थन निश्चितच नाही; मात्र हे पोलिस प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे घडलेले आहे. आपल्या चुका आणि बेजबाबदारपणा झाकण्यासाठी प्रशासन कोणतीही शहानिशा न करता माझ्यासहित शिवभक्तांवर चुकीचे गुन्हे दाखल करत आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
ज्यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमणे केली, विशाळगड सारख्या ऐतिहासिक संरक्षित स्मारकाचे आणि त्याच्या इतिहासाचे नुकसान केले, ज्यांनी या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, त्यांना कोणता गुन्हा लावणार आहे ? हा कायद्याचा कोणता सन्मान आहे ? गडावर अतिक्रमण होते हे सगळ्यांनाच मान्य आहे, मग वेळीच ते काढून का घेतले नाही? शिवभक्तांची वाट बघत होता का? हे प्रश्न या अतिक्रमणांचा पुळका येणाऱ्यांना पडत नाहीत का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.