बी. डी. सवडे, अकोलादेव ,(ता. जाफराबाद) शासनाने जादूटोणाविरोधी कायदा केल्यानंतरही ग्रामीण भागात जादूटोणा, भानामतीसारख्या अंधश्रद्धेला अनेक जण बळी पडत असून टेंभुर्णी (जाफराबाद) येथे अंधश्रद्धेतून संपूर्ण कुटुंबच दहशतीखाली असल्याचे उघड झाले आहे.येथील प्रकाश बापूराव देशमुख यांचे कुटुंब या प्रकारामुळे मागील तीन-चार वर्र्षांपासून दहशतीखाली आहे. त्यातूनच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याचा दावा देशमुख यांनी केला असून कुटुंबाची सुटका व्हावी म्हणून त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. देशमुख यांच्या घरात व घरासमोर अमावास्या व पौर्णिमेला लिंबू-मिरची, सुया, काळ्या बाहुल्या, हळद-कुंकू टाकण्याचा प्रकार सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यातून त्यांची आई, मोठा भाऊ व पुतण्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी राष्ट्रपती व पंतप्रधानांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संबंधित प्रकाराला कोण खतपाणी घालत आहे, त्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून छडा लाऊन दोषींवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये कडक कारवाई करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
भानामतीमुळे कुटुंब दहशतीखाली
By admin | Published: March 11, 2015 1:59 AM