कोल्हापूरः हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार व खासदार राजू शेट्टी यांची लोकसभेला विजयाची हॅट्ट्रिक करण्यापासून शिवसेनेने रोखलं आहे. शिवसेनेचे धैर्यशील माने यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यानंतर आता शेट्टीच्या या पराभवावर त्यांचे एकेकाळचे साथीदार आणि सध्याचे विरोधक सदाभाऊ खोत यांनी जहरी टीका केली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, हा शेतकरी चळवळीचा विजय आहे. स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्यांचा शेतकऱ्यांनीच पराभव केला आणि गर्वहरण केले आहे. शेतकरी चळवळीचा झेंडा हातात घेऊन बळीराजाचे प्रश्न मांडत राहू, असा विश्वासही सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे. दहा वर्षांपूर्वी शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील यांच्या मातोश्री निवेदिता माने यांचा पराभव केला होता. धैर्यशील यांनी दहा वर्षांनंतर या पराभवचा बदला घेत शेट्टींना अस्मान दाखवलं. निवेदिता माने 1999 आणि 2004 मध्ये इचलकरंजी मतदारसंघातून निवडून आल्या. राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी होत त्यांनी दिल्ली गाठली. त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यामुळे 2009मध्ये निवेदिता माने हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. मात्र राजू शेट्टींनी त्यांचा जवळपास 95 हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे त्यांची हॅट्रिक हुकली.
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्यांचा शेतकऱ्यांनीच पराभव केला- सदाभाऊ खोत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 18:29 IST