मुंबई : ‘सिकलसेल’ या अनुवंशिक रक्त दोष असणाऱ्या आजारग्रस्तांना सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बहुतांशी आदिवासी आणि मागासवर्गीय समाजामध्ये आढळणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचाराकरीता ग्रामिण, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालय व शासकीय महाविद्यालयात जावे लागते. त्यामुळे प्रवासात अशा रुग्णांना मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागत असल्याचे निदशर्नास आले. हे पाहता सिकलसेल आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना एका मदतनिसासह मोफत एसटी प्रवास देण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे.महाराष्ट्रात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला या जिल्ह्यांमध्ये सिकलसेल आजाराचे रुग्ण जास्त आढळून येतात. हा आजार नियंत्रणात यावा यासाठी सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २0 जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अद्यापपर्यंत या आजारावर कायमस्वरुपी उपचार उपलब्ध असल्याचे आढळून आलेले नाही. सिकलसेल आजाराने ग्रस्त रुग्णांना तपासणी आणि औषधोपचाराकरीता वारंवार रुग्णालयात जावे लागते आणि प्रवासात मोठ्या मनस्तापाबरोबरच खर्चालाही तोंड द्यावे लागते. हे पाहता ५ फेब्रुवारी २0१५ रोजी मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार राज्यातील सिकलसेलने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आणि त्याच्या एका मदतनीसाला मोफत एसटी प्रवास सवलत देण्याबाबतची योजना लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार मोफत प्रवास रुग्ण आणि त्याचा मदतनीसास देण्याचे ठरले. (प्रतिनिधी)
‘सिकलसेल’ रुग्णाला मोफत एसटी प्रवास
By admin | Published: March 12, 2015 5:11 AM