ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ११ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान असून या कार्यासाठी त्यांना भारतरत्न मिळायला पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे.
भारतरत्न पुरस्कारावरुन सध्या वाद निर्माण झाला असून केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह पाच जणांची भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारासाठी शिफारस केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सोमवारी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली. 'केंद्र सरकारने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार दिल्यास आम्ही त्याचे स्वागतच करु' असे सूचक वक्तव्य करत राऊत यांनी सावरकरांनाही भारतरत्न पुरस्कार द्यायला हवे अशी भूमिका मांडली आहे.
दरम्यान, जातीय हिंसाचारविरोधी विधेयकावर विचारले असता राऊत म्हणाले, सभागृहात मांडलेल्या विधेयकामध्ये बदल अपेक्षीत आहे. त्यामुळे सद्य विधेयकाला मंजूर करता येणार नाही. या विधेयकावर सोमवारी लोकसभेत चर्चा होणे अपेक्षीत आहे.