मिलिंद अष्टीवकर,
रोहा- रोहा तालुक्यातील तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे बेभरवसी भूकरमापकांचा अड्डा बनला आहे. या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने जमीन मोजणीच्या कामासाठी येणारे नागरिक वारंवार खेटे घालून हैराण होत आहेत. अपुऱ्या संख्येने कर्मचारी असल्याने या कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना भूकरमापकांच्या मिजासखोरीचा त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे. खातेदारांना अनेक वेळा गट स्कीम नकाशा, गट बुकाचा उतारा, सिटी सर्व्हे नकाशा व उतारा मिळविण्यासाठी चिरीमिरी देऊन सुद्धा अनेक फेऱ्या माराव्या लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.रायगड जिल्ह्यासह तालुक्यात जमीन खरेदी-विक्र ीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु रोहा तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी संख्या मात्र दिवसेंदिवस रोडावत आहे. ७६ भूकरमापकांच्या जागा रिक्त असून भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रमुख असलेले उपअधीक्षक पदच रिक्त आहे. सध्या या कार्यालयाची सूत्रे पनवेल येथील भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक एस. टी. घुले यांच्याकडे प्रभारी देण्यात आलेली आहेत. त्यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते आठवड्यातून केवळ मंगळवार आणि शुक्र वार असे दोन दिवस रोहा येथे येतात असे त्यांनी सांगितले. या सर्वचा गैरफायदा येथील भूकरमापकांनी घेतलेला दिसून येतो. मोजणीसाठी आलेल्या नागरिकांकडे मोजणीच्या जागेवर जाण्यासाठी गाडी किंवा रिक्षा, दारू, मटणाचे जेवण तसेच पैशांची मागणी करत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले आहे. मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर लगतच्या कब्जेदारांना मोजणीच्या वेळी हजर राहण्यासाठी द्यावयाच्या नोटिसा भूमी अभिलेख कार्यालयामार्फत संबंधितांना टपालाद्वारे न पाठवता संबंधित नागरिकालाच कब्जेदारांना नोटिसा बजावण्यास भूकरमापकांकडून सांगितले जाते. मोजणीसाठी भूकरमापकांना निशाणदार, चार मजूर, चुना, उंच काठ्या, छत्री या गोष्टी ज्या व्यक्तीला मोजणी करावयाची आहे त्यालाच पुरवाव्या लागतात. >नागरिकांच्या तक्रारीभूकरमापकांची सरबराई न केल्यास संबंधित खातेदाराला मोजणी नकाशा उपलब्ध करून न देणे, हिश्शाच्या खुणांबाबत माहिती न देणे, काम अर्धवट ठेवणे अशा प्रकारे त्रास दिला जातो. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याने अनेक जण या भूकरमापकांची सरबराई करण्यातच धन्यता मानतात. सरबराई न केल्यास संबंधित खातेदाराचा वेळ व पैसा दोन्ही वाया जाऊन मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्र ारी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जोशी यांच्याकडे आल्या आहेत.