मुंबई : पीक वाया गेले, घेतलेले कर्ज कुठून फेडणार, पदराकाठी उरलेल्या पैशांत घर कसं चालवणार, घरात अन्नाचा दाणा नाही, अशा अनेक विवंचनांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग योजना आखत आहे, अशी माहिती ‘लोकमत’ला आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. दुष्काळामुळे ग्रासलेल्या शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचल्याने यंदा राज्यातील ६४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला विविध स्तरातून आर्थिक मदत केली जात आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावते. पण त्याचबरोबरीने अनेक कारणे असतात, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. या शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवल्यास अशा विचारांपासून ते लांब राहतील, असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. वैफल्यग्रस्त अवस्थेत असणाऱ्या शेतकऱ्यांचे निदान होण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञाकडे औषधोपचार सुरू आहेत, असे सांगण्यास व्यक्ती तयार होत नाहीत. मानसोपचाराविषयी आपल्याकडे अजूनही गैरसमज आहेत. यामुळे तणावाखाली असलेली व्यक्तीही मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्यास तयार नसते, असे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे. शेतकऱ्यांना मानसिकरीत्या सक्षम करण्यासाठी योजना हाती घेण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत मानसिक ताणाखाली असलेल्या शेतकऱ्यांवर उपचार केले जाणार आहेत, असे आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
आरोग्य विभाग जपणार शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य !
By admin | Published: September 19, 2015 4:17 AM