ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - २०१२ मध्ये मंत्रालयात लागलेल्या भीषण आगीत अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रनप्रकरणातील फाईल जळून खाक झाल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारने दिली आहे. या प्रकरणासंदर्भात दाखल झालेल्या माहिती अधिका-याच्या अर्जावर उत्तर देताना राज्य सरकारने ही माहिती दिली आहे.
२००२मधील हिट अँड रनप्रकरणात न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सलमान सध्या जामीनावर बाहेर आहे. याप्रकरणातील राज्य सरकारने आत्तापर्यंत किती सरकारी वकिल, कायदाविषयक सल्लागार नेमले व त्यासाठी किती खर्च झाला याबाबतची माहिती मन्सूर दर्वेश यांनी माहिती अधिकारांतर्गत मागवली होती. '२०१२ मध्ये मंत्रालयाला आग लागल्याने या प्रकरणातील कागदपत्र जळून खाक झाल्याने याबाबतची सखोल माहिती उपलब्ध करुन देता येणार नाही' असे उत्तर राज्य सरकारने दिले आहे. हिट अँड रन प्रकरणातील वकिल प्रदीप घरत यांची २०१४ मध्ये नियुक्ती करण्यात आली असून प्रति सुनावणीसाठी त्यांना सहा हजार रुपयांचे मानधन दिले जात आहे ऐवढीच माहिती सरकारने दिली आहे. मंत्रालयातील आगीत जळून खाक झालेल्या कागदपत्र पुन्हा तयार केली जातील असे आश्वासन सरकारने त्यावेळी दिले होते. मात्र तीन वर्षांनंतरही सरकारने अशा फाईल्सची माहिती जमवलेली नाही हे स्पष्ट झाले आहे. या दिरंगाईच्या कारभारावर मन्सूर दर्वेश यांनी नाराजी व्यक्त केली आहे.